नांदेड जिल्ह्यात आज दुपारी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्हयातील कंधार, लोहा आणि नायगाव मध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मोठा पाऊस झाला. हदगाव, हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपट उडाली. अशातच हिमायतनगर तालुक्यातील पार्डी इथं सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना विज कोसळून एका महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशाखा येलकेवाड (वय ३०) असं मृत महिलेचं नाव आहे.
advertisement
विशाखा येलकेवाड या शेतात हळद काढण्याचं काम करत होता. अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस लगेच जाईल, अशी त्यांची धारणा होती. पण, अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि अंगावर विज कोसळली. विज अंगावर पडल्यामुळे विशाखा या जागेवरच कोसळल्या. त्यांच्यासोबत काम करत असलेल्या इतर शेतमजुरांनी धाव घेतली आणि त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेमुळे पार्डी गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. येलकेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. घटनेची माहिती तलाठी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून महसूल विभागाकडून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पिकांचं अतोनात नुकसान
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि हदगाव तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी गहू आडवा पडला आहे. तर काही ठिकाणी फळबागांचं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात २ दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
यवतमाळमध्ये वीज पडून 5 जण जखमी
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पावसाने हजेरी लावली. राळेगाव तालुक्यातील झरगड इथं वीज पडून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रामचंद्र पचारे, गणेश नने, विमल पदिले, सुनीता राऊत, वंदना पदीले अशी जखमींची नावं आहेत. शेतात काम करत असताना विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात 5 जण जखमी झाले. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट
दरम्यान, वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे अनेक गावांतील रब्बी पिकांचं अंशतः नुकसान झाले आहे. कानगाव, गाडेगाव, अलमडोह, अल्लीपूर, रोहणखेडा, नांदगाव, टाकळी दरणे, चाणकी आणि गोजी शिवार परिसरात अचानक गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शेतात काढून ठेवलेल्या चणा पिकांचे ढिग पावसामुळे पूर्णतः भिजले असून गहू, चणा, तूर आणि कपाशी पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर येत आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील गोजी शिवारात गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
