पुणे, कोल्हापूर, सातारा पट्ट्यात पावसाचे सावट
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांच्या मिलाफामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे.
१७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास या भागात आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. याव्यतिरिक्त सोलापूर आणि अहिल्यानगर भागातही पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो.
advertisement
कोकणात उकाडा, तर विदर्भात संमिश्र हवामान
मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी पट्ट्यात सध्या उष्णता वाढू लागली आहे. दिवसा उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा वर गेले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पुढील ४८ तास संमिश्र हवामान राहील. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीचा हलका गारवा टिकून असला, तरी १८ फेब्रुवारीनंतर तिथेही उन्हाची तीव्रता वाढणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सध्या रब्बी पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना, पावसाचा अंदाज ऐकून बळीराजा चिंतेत होता. मात्र, दिलासादायक बाब अशी की, हा पाऊस खूप मोठा किंवा वादळी नसेल. ओलावृष्टी किंवा गारपिटीची शक्यता नसल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार नाही. उलट, हा हलका पाऊस काही भागांतील पिकांसाठी पूरक ठरू शकतो.
दक्षिण भारतात मात्र मुसळधार
महाराष्ट्रात केवळ शिडकावा अपेक्षित असताना, दक्षिण भारतात मात्र निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळणार आहे. १७ आणि १८ फेब्रुवारीला तमिळनाडू आणि केरळच्या काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कन्याकुमारी, मदुराई आणि कोल्लम या भागात पावसाचा जोर अधिक असेल. थंडी आता शेवटच्या घटका मोजत असून, पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू होईल. १८ फेब्रुवारीनंतर रात्रीचे तापमानही वाढायला सुरुवात होणार असल्याने उबदार कपडे आता कपाटात ठेवण्याची वेळ आली आहे.
