आयुष्यभराचा संसार, अखेरपर्यंतची साथ
तुमसर तालुक्यातील सोरना गावात राहणारे लखाराम सिताराम शहारे (वय ८६) आणि जैतुराबाई लखारामजी शहारे (वय ८०) यांचा संसार साधेपणा, कष्ट आणि परस्पर समजुतीवर उभा होता. अनेक दशकांचा सहवास, सुख-दुःखाची वाटणी आणि कुटुंबासाठी केलेले त्याग यामुळे हे दांपत्य गावात आदराने पाहिले जात होते. वयाच्या उतारावरही एकमेकांची काळजी घेणारी ही जोडी अनेकांसाठी प्रेरणादायी होती.
advertisement
पतीच्या निधनाने तुटला आधार
काळाचा घाला असा की,प्रथम पती लखाराम शहारे यांचे निधन झाले. घरातील आधारवड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईक, शेजारी आणि गावकरी शोक व्यक्त करत असतानाच सर्वात मोठा धक्का जैतुराबाईंना बसला. आयुष्यभर ज्यांच्या सोबतीने प्रत्येक दिवस जगला, अचानक विरह त्यांच्या सहनशक्तीच्या पलिकडचा ठरला.
अवघ्या आठ तासांत पत्नीचाही निरोप
पतीचा मृतदेह घरात असतानाच जैतुराबाईंना तीव्र धक्का बसला. शोक, आठवणी आणि विरह यांचा ताण त्या सहन करू शकला नाही. अवघ्या आठ तासांच्या अंतराने त्यांनीही प्राण सोडले. एका दिवसात घरातील दोन आधारस्तंभ निघून गेल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली.
एकाच सरणावर अखेरचा प्रवास
जसे त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ दिली, तसाच अखेरचा प्रवासही एकत्र व्हावा, अशीच ग्रामस्थांची भावना होती. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी एकमताने निर्णय घेत या वृद्ध दांपत्यावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार केले. अंत्यविधीवेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. “मृत्यूलाही या नात्याला वेगळे करता आले नाही,” अशीच भावना सर्वांच्या मनात उमटत होती.
