ज्या गल्लीत तीन-तीन माजी आमदारांचे वास्तव्य आहे, तिथेच साधारण २०१२ च्या सुमारास भोंदू 'कॅप्टन' अशोक खरातने ५ कोटींहून अधिक खर्च करून आपला 'तृप्तबाला' नावाचा महाल उभा केला. मात्र, हा बंगला केवळ त्याच्या भव्यतेसाठी नाही, तर तिथल्या भिंतींमागे दडलेल्या काळपट कृत्यांमुळे आता नाशिकमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर, या महालाच्या गर्भात दडलेली अनेक काळी रहस्ये आता उघड होऊ लागली आहेत.
advertisement
अमावास्येचा 'दरबार' आणि व्हीआयपी पाहुणे
'दिव्य मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार, खरातच्या या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे, असा खळबळजनक खुलासा स्थानिक नागरिकांनी केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर नागरिकांनी सांगितले की, "अमावास्येच्या रात्री या बंगल्याबाहेर महागड्या आलिशान गाड्यांच्या रांगा लागायच्या." विशेष म्हणजे, राजकीय नेते, बडे अधिकारी आणि आपली ओळख लपवू पाहणारे अनेक 'व्हीआयपी' लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता, चोरट्या पावलांनी या बंगल्याची पायरी चढायचे. रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या छुप्या दरबारात नक्की काय चालायचे? याची आता संपूर्ण नाशिकमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
सुरक्षेसाठी विदेशी श्वान...
खरातने आपल्या काळ्या कारनाम्यांभोवती केवळ सिमेंटची तटबंदीच उभारली नव्हती, तर सुरक्षेच्या नावाखाली दहशतीचे एक साम्राज्य निर्माण केले असल्याचे सांगण्यात येते. बंगल्याच्या आवारात लाखो रुपये किमतीचे दोन विदेशी जातीचे हिंस्र श्वान पाळण्यात आले होते. या कुत्र्यांच्या भीतीने परिसरातील नागरिक या बंगल्याच्या सावलीला उभे राहण्याचेही धाडस करत नसत. एक प्रकारे या श्वानांचा वापर करून खरातने आपल्या गुन्हेगारी कृत्यांभोवती दहशतीचे एक 'अदृश्य कुंपण' तयार केले होते.
