नियतीने वेगळंच लिहून ठेवलं होतं. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागडमध्ये सोमवारी दुपारपर्यंत सगळं काही सुरळीत होतं. मात्र, जान्हवीचे वडील हौशीलाल राहांगडाले यांचा अपघाती मृत्यू झाला आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मंगळवारी सकाळी घरात वडिलांचे पार्थिव अंतिम दर्शानसाठी ठेवलं होतं, आईनं हंबरडा फोडला होता, दुर्घटनेतून कोणीच सावरलं नव्हतं, नातेवाईक जमले होते कुटुंबियांचा आक्रोश पण जान्हवीनं स्वत:ला सावरलं. तिला वडिलांचे शब्द आठवत होते, मंगळवारी बारावीचा इंग्रजीचा पेपर होता. काळाजावर दगड ठेवला, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंदर्शन घेऊन ती पहिल्या पेपरला पोहोचली. बारावीच्या परीक्षेपेक्षाही ही जान्हवीच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी परीक्षा होती.
advertisement
शिकून मोठी हो पोरी असं तिचे वडील नेहमी म्हणायचे, तेच स्वप्न जान्हवीला स्वस्थ बसू देत नव्हते. डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत, केवळ वडिलांच्या याच शब्दाखातर तिने मामाच्या मुलासोबत आंबागड ते तुमसर असा ८ किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा केंद्र गाठलं. मनात भीती, डोळ्यात अश्रू आणि बापाला शेवटचं पाहण्यासाठी आसूसलेलं मन अशाच अवस्थेत तिने पेपर सोडवला, पेपर संपताच घराकडे धाव घेतली. जान्हवी परतल्यानंतरच वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भंडाऱ्यात जान्हवीने धैर्याने दुःख पचवले असतानाच, डोंबिवलीत मात्र एका उमद्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. सोहम कटरे हा विद्यार्थी बारावीच्या पहिल्या परीक्षेसाठी उत्साहात घराबाहेर पडला होता. मात्र, कळवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनमधून गर्दीदरम्यान पडून सोहमचा भीषण अपघात झाला आणि त्यात त्याने जीव गमावला. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
