सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही मोठा नेता बैठकीत न दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित राहिल्याने "मविआ राज्यात संपुष्टात आली आहे का?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
advertisement
बैठकीला राष्ट्रवादीची दांडी, भास्कर जाधवांनी काय म्हटले?
ठाकरे गटाचे कार्यालय 'शिवालय'मधील बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनुपस्थितीबाबत भाष्य केले. भास्कर जाधव यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचा मित्रपक्ष कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कम्युनिकेशन गॅपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित नसल्याचे त्यांनी म्हटले. पत्रकार परिषद संपे पर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते येतील असे जाधव यांनी म्हटले.
विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला जेरीस आणण्यासाठी विविध मुद्दे विधीमंडळात उपस्थित करण्याच्या अनुषंगाने आजची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत समन्वय नसल्याची अप्रत्यक्ष कबुली ठाकरेंच्या नेत्याने दिल्यानं मविआत काय चाललयं याची चर्चा सुरू झाली आहे.
विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह
राज्यातील महायुती सरकारचा एकत्रितपणे विरोध कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित होती. मात्र, राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीमुळे मविआमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. विलीनीकरणाच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे मतभेद आहेत की आणखी काही राजकीय समीकरणे शिजत आहेत, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत वाद असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाने संख्याबळाच्या आधारे आपला दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने शरद पवारांच्या नावावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यावरूनही मविआत आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे.
