ही धक्कादायक घटना घडल्यानंतर नातेवाईकांचा एकच आक्रोश बघायला मिळाला आहे. दीपशीखा गिरीश गोडबोले असं मृत पावलेल्या वधूचं नाव आहे. ती मुंबईतील दादर-माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ राहते. दीपशीखा यांचा विवाह नाशिकमधील गंगापूर जवळील एका रिसॉर्टमध्ये ठरला होता. यासाठी संपूर्ण गोडबोले कुटुंब आणि वऱ्हाडी नाशिकमध्ये दाखल झाले होते. शनिवारी रात्री संगीत सोहळा उत्साहात पार पडला, दीपशीखा यांच्या हातावर मेहंदीही सजली होती. मात्र, रविवारी सकाळी लग्नाच्या विधींची तयारी सुरू असताना अचानक अनर्थ घडला.
advertisement
सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास रिसॉर्टमधील खोली क्रमांक २०१ मध्ये नातेवाईकांसोबत असताना दीपशीखा अचानक चक्कर येऊन पडल्या. त्यांच्या आत्या डॉ. स्वाती बापट यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना श्रीगुरूजी रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दगदग जीवावर बेतली?
मिळालेल्या माहितीनुसार, दीपशीखा यांना लग्नाच्या मुहूर्तासाठी तयार होत असताना थोडे अस्वस्थ वाटत होते. आदल्या रात्रीचे जागरण, लग्नातील धावपळ आणि दगदग यामुळे हे होत असावे, असा समज करून त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, हीच अस्वस्थता त्यांच्या जीवावर बेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुर्दैवी योगायोगाची चर्चा
या घटनेनंतर एक धक्कादायक योगायोग समोर आला आहे. ज्या रिसॉर्टमध्ये ही घटना घडली, त्याच ठिकाणी अवघ्या आठवडाभरापूर्वी एका वधूपित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. आता त्याच ठिकाणी हळदीच्या दिवशी वधूचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आलं आहे.
