नेमकी घटना काय?
आंबेहोळ येथील रहिवासी पवन चौधरी हे गावातच छोटेसे किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रोजचा घाम गाळून त्यांनी संसाराला हातभार लावण्यासाठी काही पैसे साठवले होते. मात्र, काळाला हे सुख मान्य नव्हतं. घरात शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
advertisement
रोकड आणि स्वप्नांची राख
या आगीत केवळ घरातील धान्य, कपडे किंवा भांडीच जळाली नाहीत, तर पवन चौधरी यांनी व्यवसायासाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी घरात ठेवलेली सुमारे एक ते दीड लाखांची रोकड पूर्णपणे जळून कोळसा झाली. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही रक्कम म्हणजे त्यांच्या आयुष्याची मोठी पुंजी होती. घराच्या भिंती उभ्या आहेत, पण आतमध्ये आता फक्त राख उरली आहे. या घटनेमुळे पवन चौधरी यांच्यावर आभाळ कोसळलं असून त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
चौधरी कुटुंबाकडून मदतीची मागणी
घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. "पवन हा कष्टाळू माणूस आहे, किराणा दुकान चालवून तो प्रपंच चालवत होता, पण आता त्याच्याकडे खाण्यासाठी दाणाही उरलेला नाही," अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. या दुर्घटनेमुळे त्यांच्यासमोर आता कुटुंबाचं पोट कसं भरायचं, हा मोठा प्रश्न आहे. या भीषण आगीत चौधरी कुटुंबाचं सगळंच गेल्याने, त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी आर्त मागणी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
