जिल्हा परिषद-पंचायत समितीत भाजपला मोठे यश
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत. काऊंटिंगचा शेवटचा टप्पा सुरू आहे, कल लक्षात घेता राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. १२ जिल्हा परिषदेतील सात ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झालेला दिसतो आहे . बाराही ठिकाणी महायुती असेल हे स्पष्ट झालंय. सात ठिकाणी भाजप नंबर एकवर, शिवसेना दोन ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात एक नंबरवर आहे आणि तिन्ही एकत्र लढलो. त्यात कोल्हापूर, लातूर महायुती पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपने २०१७ चा रेकॉर्ड जिल्हा परिषदेचा तोडला आहे. घोषित निकालात २३६ जागा भाजपला मिळाल्या आहे, असे फडणवीस म्हणाले.
advertisement
पंचायत समितीचा विचार केला त्यात घोषित जागांमध्ये २०१७ साली २८४ जागा होत्या. आत्ता ४१० जागा भाजपचा मिळाल्या आहेत. भाजपने मोठी उडी मारली आहे आणि मित्र पक्षांना देखील चांगल्या जागा मिळाल्या आहेत. ५० पंचायत समिती भाजप, २६ शिवसेना, २० राष्ट्रवादी, ५ ठाकरेंकडे असणार आहे. महायुतीला १०० च्या वर पंचायत समिती जिंकता आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अजितदादा गेले, आम्हाला खूप दु:ख, मी भावनिक आवाहनाचा व्हिडीओ केला
निवडणुकांदरम्यान अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचे दुःख आहे. मी एक आवाहनाचा व्हीडिओ केला होता. ग्रामीण मानसिकता पूर्णपणे समोर आली आहे. सगळ्या निवडणुकांत राज्याने केलेले काम त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. सहकारी पक्षाचे अभिनंदन करतो, भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात चांगले यश मिळाले. राज्यातील जनतेचे आभार मानतो. आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
हसत हसत विरोधकांना चिमटे
विरोधकांना खरोखर चिंतनाची गरज आहे. ते जर चिंतन करणार असतील तर योग्य मार्गावर आहे. पण कोणावरही खापर फोडतात ते कधीही जिंकू शकत नाही. महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही. आम्हाला फार करण्याची काही गरज नाही. त्यांचे प्रवक्ते सकाळी ९ वाजता बोलतात त्यातून आम्हाला फायदा होतो. त्यांची विधाने असतात, ज्याला सत्यता नसते, त्यातून आमचे काम सोपे होते. मुळात विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती पाहिजे, त्याचा अभाव दिसतो. जनतेत जात आपल्याला आवाज बनावा लागतो. विरोधक फक्त माध्यमात दिसतो, जनतेत दिसत नाही, अशी टोलेबाजी करीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटे काढले.
