या सोहळ्यासाठी मुख्य पाहुणे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित या बारा आत्मसमर्पित माओवाद्यांचे लग्न पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभाशिर्वाद दिले.
या संपूर्ण लग्नामध्ये दोन्ही बाजूने वऱ्हाडाची भूमिका गडचिरोली पोलीस दलाने बजावली. गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने झालेल्या या आत्मसमर्पित माओवाद्यांच्या लग्नानंतर त्यांच्या जीवनाला आता नवी कलाटणी मिळाली आहे.
advertisement
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.
यापूर्वी शरणागती पत्करलेल्या 13 पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांचा आज एक सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता, त्याला हजेरी लावत त्यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-103 शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून 19 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत. त्यांच्या चाब्या त्यांनी आज पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या. या दौर्यात मंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.
नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे बक्षीस होते. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. त्यांना भारताच्या संविधानाची प्रत आज आपण भेट दिली. लॉईडसारख्या उद्योगांनी पुनर्वसनात मोठा हातभार लावला आहे. हा जिल्हा रोजगारयुक्त करायचा आणि भारताचे पोलाद शहर म्हणून तो विकास करायचा आहे. हे करताना येथील निसर्गसंपदा, जल, जमीन, जंगल कायम ठेवूनच हा विकास करण्याचा शासनाचा निर्धार आहे.