मालेगाव : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावचे राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. या निवडणुकीत एमआयएम पक्षाने 60 जागांवर उमेदवार उभे केल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या प्रचारासाठी खासदार असुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अवघ्या 20 मिनिटांच्या भाषणात ओवेसी यांनी स्थानिक व राज्यातील राजकीय नेत्यांवर तीव्र शब्दांत टीका करत वातावरण चांगलेच तापवले.
advertisement
अजित पवारांवर टीका
ओवेसी यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर निशाणा साधला. आसिफ शेख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘प्यादे’ असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार टोला लगावला. “अजित पवार जर शरद पवार यांचे होऊ शकले नाहीत, तर ते दुसऱ्या कोणाचे कसे होणार?” असा सवाल उपस्थित करत केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुंबईत बसून वडापाव आणि मलाई खात राजकारण करतात, असंही ओवेसी यांनी म्हंटलं. निवडणुकीच्या काळात हे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून सामान्य जनतेची दिशाभूल करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात मालेगावसारख्या शहरांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ट्रम्प यांचा दिवाना म्हणून उल्लेख
ओवेसी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय घडामोडींनाही स्पर्श केला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करताना त्यांनी ट्रम्प यांचा ''दिवाना” असा शब्दप्रयोग केला. ट्रम्प प्रशासनाने लावलेल्या टॅरिफमुळे मालेगावचा यंत्रमाग उद्योग मोठ्या अडचणीत सापडल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयांचा थेट परिणाम येथील विणकर, कामगार आणि लघुउद्योगांवर झाला असून, हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाल्याचे ओवेसी यांनी सांगितले.
