राज्याचे दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील वरळी डोममध्ये सर्वपक्षीय नेते हजर होते. तसेच उद्योग, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रातील नामवंत, न्यायपालिकेतील उच्चपदस्थ उपस्थित होते. याच शोकसभेत बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
अजितदादांचे जाणे हे राज्याचेच नव्हे तर देशाचे नुकसान
advertisement
माजी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, २८ जानेवारीची सकाळ राज्यासाठी नाही तर देशासाठी दुर्दैवी ठरली. अगदी सकाळी बातम्या आल्या, अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. काही वेळात बातम्या आल्या की अजितदादा आपल्याला सोडून गेले. अजितदादांचे जाणे हे राज्याचेच नव्हे तर देशाचे नुकसान आहे.
अजितदादा मला सांगायचे पैसे कमी पडू देणार नाही, फक्त...
माझे वडील दादासाहेब गवई आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे अतिशय जवळचे मित्र. मी २००३ साली न्यायमुर्ती झालो. नंतर २०१४ ला ज्येष्ठ न्यायमुर्ती झालो त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री झाले. न्यायिक पायाभूत सुविधा चांगल्या उभ्या राहाव्यात, यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साथीने आम्ही प्रयत्न केले. न्यायालयासंबंधींच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याकरिता कार्यपालिकेची आवश्यकता असते. २०१४ पासून आतापर्यंत फडणवीस-ठाकरे-शिंदे- अजितदादा सगळ्यांनीच उत्तम योगदान दिले, त्यांच्यामुळेच राज्यात न्यायालयांच्या इमारती उभ्या राहिल्या.
अजितदादांनी फंड देण्याकरिता कधीच आढेवेढे घेतले नाही
पुढे बोलताना गवई म्हणाले, अजितदादांनी फंड देण्याकरिता कधीच आढेवेढे घेतले नाही. माझ्या वडिलांच्या स्मारकाचे लोकार्पण झाले, त्यावेळी दादा आले होते. न्यायव्यवस्थेसंबंधी कोणत्याही इमारतींच्या कुठल्याही कामांना निधी कमी पडणार नाही, असे ते सांगत. इमारती चांगल्या प्रतीच्या झाल्या पाहिजे, दर्जा उत्तम राहिला पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्या गुणांबद्दल सगळेच बोलतायेत. अजितदादांचे काम महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. पवार कुटुंबाला या संकटातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना भूषण गवई यांनी केली.
