म्हाडा म्हणजे काय?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा ही राज्य शासनाची संस्था असून अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे काम करते. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा विविध मंडळांमार्फत म्हाडा सोडती राबवतो.
एकावेळी किती ठिकाणी अर्ज करता येतो?
म्हाडाच्या नियमानुसार एकाच सोडतीमध्ये अर्जदार एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करू शकतो, मात्र काही अटी आहेत. एका सोडतीत जर वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनांत घरे उपलब्ध असतील, तर अर्जदार त्या सर्व योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करू शकतो. उदाहरणार्थ, मुंबई मंडळाच्या सोडतीत अंधेरी, गोरेगाव, कांदिवली अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरे असतील, तर पात्र अर्जदार त्या सर्व ठिकाणांसाठी अर्ज करू शकतो.
advertisement
मात्र अट काय?
प्रत्येक घरासाठी स्वतंत्र अर्ज शुल्क (Application Fee) भरावे लागते. म्हणजेच एकाच सोडतीत तीन ठिकाणी अर्ज केला, तर तीन वेळा अर्ज फी भरावी लागते. तसेच, अर्जदाराने पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत उत्पन्न गट, वय, अधिवास (डोमिसाइल) आणि इतर नियम.
वेगवेगळ्या मंडळांत अर्ज करता येतो का?
याचं उत्तर 'होय' असं आहे. जर एकाच कालावधीत म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळांच्या (उदा. मुंबई मंडळ, पुणे मंडळ, कोकण मंडळ) सोडती सुरू असतील, तर अर्जदार प्रत्येक मंडळाच्या सोडतीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो. मात्र प्रत्येक सोडतीसाठी स्वतंत्र नोंदणी, अर्ज आणि अनामत रक्कम (Earnest Money Deposit – EMD) भरावी लागते.
एकाच अर्जावर किती घरे मिळू शकतात?
महत्त्वाची बाब म्हणजे एका सोडतीत अर्जदाराला फक्त एकच घर मिळू शकते. जरी अर्जदाराने अनेक ठिकाणी अर्ज केले असले, तरी संगणकीय सोडतीत एकाच घराची लॉटरी लागते. एकदा घर मिळाल्यानंतर उर्वरित अर्ज आपोआप रद्द होतात.
अर्ज करताना काय काळजी घ्यावी?
अर्ज भरताना उत्पन्न गट अचूक निवडावा
कागदपत्रांची माहिती बरोबर भरावी
एकाच नावाने अनेकदा एकाच घरासाठी अर्ज करू नये
अर्ज शुल्क व अनामत रक्कम वेळेत भरावी
अर्जदारांना होणारा फायदा
एकावेळी अनेक ठिकाणी अर्ज करण्याची मुभा असल्यामुळे घर मिळण्याची शक्यता वाढते. विशेषतः मुंबईसारख्या शहरात जिथे स्पर्धा प्रचंड आहे, तिथे हा पर्याय अर्जदारांसाठी फायदेशीर ठरतो.
