वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला समान अधिकार
सन २००५ मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणेनंतर मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांइतकाच समान वाटा देण्यात आला आहे. यापूर्वी मुलींना या मालमत्तेत थेट हक्क नव्हता, मात्र आता विवाहित किंवा अविवाहित, घटस्फोटित किंवा पुनर्विवाहित सर्व मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत समान अधिकार आहेत. याचा अर्थ असा की वडिलांना जी मालमत्ता त्यांच्या वडिलांकडून किंवा पिढ्यान्पिढ्या मिळाली आहे, त्यावर मुलगा आणि मुलगी दोघांचाही समान हक्क आहे.
advertisement
मृत्युपत्र नसल्यास संपत्तीची वाटणी कशी होते?
जर वडिलांचे निधन मृत्युपत्र न करता झाले, तर त्यांची संपत्ती कायद्यानुसार सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात वाटली जाते. यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हिस्सा मिळतो. मालमत्ता स्वतः कमावलेली असो किंवा वडिलोपार्जित असो.मृत्युपत्र नसल्यास समान वाटणीचा नियम लागू होतो.
आजोबांची मालमत्ता आणि मुलीचा हक्क
जर आजोबांची मालमत्ता वडिलांना वारशाने मिळाली आणि पुढे फक्त वडील व मुलाच्या नावावर नोंद झाली, तरीही मुलीचा हक्क संपत नाही. कारण वडिलोपार्जित मालमत्तेवर कुटुंबातील सर्व सहहिस्सेदारांचा जन्मत: हक्क असतो. त्यामुळे अशा मालमत्तेत मुलगी हिस्सा मागू शकते आणि तो देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.
स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेवर मृत्युपत्र लागू
वडिलांनी स्वतः कमावलेली किंवा खरेदी केलेली मालमत्ता ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते. अशा मालमत्तेबाबत वडिलांनी मृत्युपत्र केले असेल आणि त्यात संपूर्ण मालमत्ता फक्त मुलालाच देण्याची इच्छा व्यक्त केली असेल, तर मुलगी त्यावर दावा करू शकत नाही. कारण मृत्युपत्र हे केवळ स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेसाठी वैध असते.
वडिलोपार्जित संपत्तीवर मृत्युपत्र चालत नाही
कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र करून वडिलोपार्जित संपत्ती इतर कोणाच्या नावावर देऊ शकत नाही. कारण त्या संपत्तीवर आधीपासूनच सर्व सहहिस्सेदारांचा समान अधिकार असतो. त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी केवळ कायद्याप्रमाणेच होऊ शकते.
वाद टाळण्यासाठी काय करावे?
कुटुंबात भविष्यात वाद निर्माण होऊ नयेत यासाठी पालकांनी हयातीतच आपल्या मालमत्तेचे स्पष्ट नियोजन करणे आवश्यक आहे. स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेसाठी मृत्युपत्र किंवा गिफ्ट डीड करून वाटणी निश्चित केल्यास गैरसमज टाळता येतात. यासाठी अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे हिताचे ठरते.
