कृष्णा नदी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असताना जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतींमधील विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड व घालवाड येथील नागरिकांनी वारंवार मंडळाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करत दोषी उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित यंत्रणा तात्काळ सील करण्याची मागणी करण्यात आली.
advertisement
ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला
पंचायत समिती सदस्य सीमा म्हैशाळे, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसह प्रदूषित भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीत विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. आरोग्याशी खेळणाऱ्यांना संरक्षण आणि तक्रारदारांना केवळ प्रतीक्षा ही दुटप्पी भूमिका थांबवा, असा सवाल करत ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला.
दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन
दरम्यान, संबंधित उद्योगांवर तातडीने कठोर कारवाई करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्ष कृती होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
