लातूर : डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे बचावलेआहेत. त्यांच्यावर आता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उजव्या कानशिलातून बुलेट फायर होऊन डाव्या बाजूने गोळी आर-पार निघूनही बाबासाहेब मनोहरे बचावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोळी लागल्याने डोक्याच्या कवटीच्या काही भागाचा भुगा झाल्यानंतर कशी शस्त्रक्रिया केली ? किती दिवसात ते ठणठणीत होणार ? याविषयी त्यांच्यावर उपचार करणारे न्यूरो सर्जन डॉ. हनुमंत किनीकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
डॉ. हनुमंत किनीकर म्हणाले, बाबासाहेब मनोहरे यांचे नशीब बलत्वर म्हणून त्यांचा जीव वाचला. ज्या ठिकाणाहून बुलेटने प्रवास केला तिथे आजूबाजूला रक्तवाहिन्या होत्या. रक्तवाहिन्यांच्या बाजूने बुलेट गेल्या त्यामुळे फक्त मेंदूला दुखापत झाली, रक्तवाहिन्यांना धक्का लागला नाही, त्यामुळे मोठ्या संकटातून बाबासाहेब मनोहरे यांचा जीव वाचला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तस्त्राव जास्त झाला असला तरी उपचारासाठी ते वेळेत रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात येईपर्यंत त्यांचे 1 लीटर रक्त गेले होते.
दीड ते दोन महिन्यात ठणठणीत बरे होणार
बुलेट जर दोन किंवा तीन मि.मी. इकडे तिकेडे गेली असती तर त्यांचा जागेवरच मृत्यू झाला असता पण सुदैवाने असे काही झाले नाही त्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात असून सध्या उपचार सुरू आहे. सध्या जीवाचा धोका टळला आहे. ते एक- दीड महिन्यात ते पूर्णपणे रिकव्हर होतील, अशी माहिती डॉ. हनुमंत किनीकर यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शासकीय निवासस्थानात 5 एप्रिलला रात्री 11 वाजता डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी डोक्यात उजव्या बाजूने शिरून डाव्या बाजूने पडली. जखमी झालेले मनोहरे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खिडकीतून हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांची पत्नी भाग्यश्री मनोहरे यांनी किंकाळी फोडली. यावेळी मनोहरे यांची दोन्ही मुलं घरीच होती. गार्ड आणि ड्रायव्हरच्या मदतीनं मनोहरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.घरगुती वादातून बाबासाहेब मनोहरेंनी गोळी झाडून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पोलिसांनी कुटुंबियांची प्राथमिक चौकशी केलीय. उच्च पदस्थ सनदी अधिकाऱ्यानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
