विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
मराठा आरक्षणासाठी एकीकडे चलो मुंबईचा नारा दिला जात असताना बळीराम मुळे या 35 वर्षाच्या तरुणाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केल्याने आता लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार वेळकाढूपणा करतंय, जरांगेंना वारंवार उपोषण करायला भाग पाडतेय, असा आरोप करत एका तरुणाने विष प्राशन केलं. हमदपूर तालुक्यातील शिंदगी बु्द्रुक येथील या युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपासून तो मुंबईला आंदोलनासाठी जाण्याची तयारी करत होता.
advertisement
जरांगे पाटील मला माफ करा
मंगळवारी सायंकाळी शेतात मात्र त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी त्याने एक चिठ्ठी देखील लिहिली. मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करत आहे. जरांगे पाटील मला माफ करा, असं या तरुणाने चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. बळीराम मुळे याचे लग्न झालेले असून दोन मुली आहेत. भावासोबत दहा एकर कोरडवाहू शेतीत तो दिवसभर राबतो. घटनेची माहिती मिळताच मित्रपरिवाराने त्याला तात्काळ लातूर येथील कवठाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबईच्या दिशेने कूच
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीड, पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज रात्रीपासूनच वळवण्यात आलेली आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते चारचाकी, दुचाकीच्या ताफ्यातून मुंबईच्या दिशेने कूच करतील. २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून शहागड, तुळजापूर, पैठण शेवगाव मार्गे 29 ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे नियोजन आहे.
मराठा समाजबांधव सहभागी
दरम्यान, यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीडसह शहरातून मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी होतील. या मोर्चा दरम्यान 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुधवारी मध्यरात्री 12 ते गुरुवारी सकाळी 6 वाजेदरम्यान वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहे.