विदर्भात थंडीची लाट
गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट नोंदवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भाला लागून असलेल्या छत्तीसगड आणि तेलंगणा भागातही शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागपूर, गोंदिया आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवणार आहे. तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या काही भागात तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी खाली येईल.
advertisement
दक्षिण महाराष्ट्रात मात्र काही दिवसांनंतर तापमानात पुन्हा २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तिथे थंडीचा प्रभाव थोडा कमी होऊ शकतो. महाराष्ट्राच्या हवामानावर उत्तर भारतातील घडामोडींचा मोठा परिणाम होत आहे. सध्या एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला असून, यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि विदर्भातील तापमानात घट होत आहे.
महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वे आणि विमान वाहतुकीवर या धुक्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमिश्र हवामान पाहायला मिळेल. कोकण आणि मुंबईच्या किनारपट्टीवर हवामान आल्हाददायक राहील, तर उर्वरित महाराष्ट्रात हुडहुडी कायम असेल.
