मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचारी आणि सुमारे ८ लाख ७२ हजार निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि अनुदानप्राप्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या महागाईच्या काळात हा मोठा आर्थिक आधार मानला जात आहे.
advertisement
> महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम कशी मिळणार?
वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ च्या पगारापासून रोखीने मिळण्यास सुरुवात होईल. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील ४ महिन्यांची थकबाकी (Arrears) मार्च २०२६ मध्ये दिली जाईल. तर, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या ३ महिन्यांच्या थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश लवकरच काढले जातील.
या वाढीव खर्चामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेऊन, संबंधित विभागांच्या मंजूर अनुदानातूनच हा खर्च भागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुढीपाढव्याच्या तोंडावर थकबाकी मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी फेब्रुवारी-मार्चमध्येच साजरी होणार असल्याचे चित्र आहे.
