दिल्लीला जात असताना चोरट्यांच्या एका हल्ल्यात प्रकाश यांनी आपली स्मृती गमावली. आपलं नाव, गाव आणि आई-वडील...गाव काहीच आठवेनासं झालं. त्यांना एका आश्रमात ठेवण्यात आलं. तिथे पुन्हा हॉटेल मॅनेजमेंट करून त्यांनी कामानिमित्ताने अनेक देशांमध्ये भ्रमंती केली.
स्मृती नसतानाही गाठलं युरोप
advertisement
स्वतःची ओळख पुसली गेली असली तरी काहीतरी मोठं करुन दाखवण्याची जिद्द कायम होती. एका आश्रमात वाढलेले प्रकाश आपल्या कर्तृत्वावर थेट युरोपमध्ये पोहोचले. जगभर फिरले, पैसा कमावला, पण ३२ वर्षांच्या या काळात आपल्या जुन्या आठवणी मात्र ते कायमचे विसरले होते. त्यानंतर नियतीची चक्र अशी काही फिरली की चमत्कारच म्हणावा लागेल. डिसेंबर २०२४ मध्ये माल्टा इथे वास्तव्यास असताना झालेल्या एका भीषण अपघाताने चमत्कार घडवला. उपचारादरम्यान ३२ वर्षांपूर्वीच्या सर्व आठवणी अचानक जिवंत झाल्या.
सोशल मीडियावरुन कुटुंबियांना शोधलं
स्मृती परतताच प्रकाश यांनी आपल्या कुटुंबाचा शोध सुरू केला. सोशल मीडियाच्या मदतीने चुलत भाऊ सुभाष जाधव यांच्याशी संपर्क झाला आणि तब्बल ३ दशकांनंतर हरवलेला मुलगा सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा प्रकाश आपल्या हरिलाल नाईक तांड्यावर परतले, तेव्हा संपूर्ण गावाने फटाक्यांच्या अतिषबाजीने त्यांचं स्वागत केलं. फुलांच्या पायघड्या घातल्या, त्यांचं औक्षण केलं.
इतकी वर्षं परदेशात राहिल्याने प्रकाश आपली बंजारा बोली विसरले आहेत, पण मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. परदेशात यश आणि संपत्ती मिळवूनही मायभूमीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना.
