एका विवाहित महिलेनं अशाप्रकारे आपल्या पोटच्या मुलांसोबत क्रूर कृत्य केल्याने आणि स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशा जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. या प्रकरणी सासरे कल्याण जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना शनिवारी (दि. २८) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. फिर्यादीत कल्याण जाधव यांनी सांगितलं की, ते शेती व्यवसाय करतात. त्यांचा मोठा मुलगा नीलेश जाधव हा धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कल्याण जाधव व त्यांची पत्नी सुचिता हे ममदापूर येथील शेतात गेले होते. त्या वेळी घरी त्यांची सून आशा जाधव (२८) ही तिची सहा वर्षांची मुलगी अद्विका आणि सहा महिन्यांच्या मुलासह होती.
दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास जाधव यांना शेजारी अल्लामिन शेख यांनी फोन केला होता. तुमच्या सुनेनं दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारल्याचं त्यांनी जाधव यांना सांगितलं. माहिती मिळताच जाधव तातडीने घरी परतले. त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पाहणी केली असता सहा महिन्यांचा नातू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. धारदार ब्लेड व कटरने त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. घटनास्थळी रक्ताने माखलेले ब्लेड व कटर पोलिसांनी जप्त केले आहेत.
जाधव दांपत्याने पांगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तिथे त्यांची नात अद्विका गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर व हातावर खोल जखमा होत्या. प्राथमिक उपचारानंतर आशा व अद्विका यांना पुढील उपचारासाठी बार्शी आणि नंतर सोलापूर येथे हलवण्यात आले. याप्रकरणी आशा जाधव हिच्याविरुद्ध स्वतःच्या मुलाची हत्या व मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आशा जाधव यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
