महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयासमोर अशोक खरात याला हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याला ७ दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे यु्क्तिवाद ऐकून न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी सरकारी वकिलांनी ईशान्येश्वर मंदिरातातील पूजा, नरबळीचा संशय आदी बाबी उपस्थित करून खरातची पोलीस कोठडी वाढविण्याची विनंती केली. याचवेळी खरातने भक्तांना कसे कसे गंडवले, याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. अशोक खरात याच्याजवळ असलेल्या २० फुटाच्या नागाचा उल्लेख सरकारी वकिलांनी त्याचे 'उद्योग' कोर्टासमोर आणले.
advertisement
सापाबद्दल विचारताच गांगरलेला अशोक खरात म्हणाला...
न्यायालयात पुजाविधीदरम्यानच्या नागाचा विषय निघताच अशोक खरात एकदम गांगरला. काय बोलावे हेच त्याला काही वेळ कळले नाही. न्यायालयाने यासंदर्भात विचारले असता, आपल्याला याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे त्याने भासवले. मला त्या नागाविषयी काही माहिती नाही, असे तो न्यायालयाला म्हणाला.
अशोक खरात याच्या जवळ असलेल्या नागाची गोष्ट
नाशिक शहर हे अनेक दोष निवारणासाठी देशात प्रसिद्ध आहे. कालसर्प दोष, नारायण नागबळी आणि इतर धार्मिक विधींसाठी देशातील सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचा उल्लेख केला जातो. हेच हेरून त्याने भक्तांना मूर्खात काढण्यासाठी सर्प पूजा घालण्याचे सुरू केले. एकदा का दरबारात भक्त मंडळी जमले की अशोक खरात हा ध्यानात मग्न व्हायचा. पुढची काही मिनिटे तंत्र मंत्र म्हणून थेट नागराजाचा धावा करीत असते. काही वेळात २० फुटांचा नाग त्याच्या आजूबाजूला यायचा. अशोक खरात याच्या विशिष्ट बोलण्यानंतर नाग फणा काढून डोलत असे. समोर भला मोठा नाग पाहून भक्त मंडळींची बोबडी वळत असे. अनेक जण तर भीतीने कोमात जाण्याचे प्रसंग ओढावले, असे सूत्र सांगतात. हे सगळे पाहून अनेक गर्भश्रीमंत भक्तांना त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा भास झाला. समोर पाहिलेले दृश्य भक्त मंडळी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगत. महाराजांच्या दिव्य शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि आयुष्यातल्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हीही एकदा बाबांकडे जाऊन या, असे सांगत असत.
परंतु सध्या सुरू असलेल्या चौकशीत तो नागच खोटा असल्याचे कळते आहे. कागदी नागाला सेम टू सेम कातडी (कात) लावून त्याचा रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असे. त्यामुळे त्याच्या तालावर नाग नाचत असे. त्याच्या याच खोट्या कृतीला भुलून भोंदू कॅप्टनने राजकीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना नादी लावले. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे भविष्य पाहणाऱ्या कॅप्टनचे भविष्य मात्र सध्या अंधारात आहे.
