आता अशोक खरातच्या अटकेची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. अशोक खरात परदेशात पळून जाईल, अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळे अटकेच्या आठ ते दहा दिवस आधीपासून शिर्डी पोलिसांनी अशोक खरातच्या घराबाहेर साध्या गणवेशातील पोलिसांना तैनात केलं होतं. त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जात होतं. शिर्डी पोलिसांच्या या ट्रॅपमुळेच खरात पोलिसांच्या तावडीत सापडला. अन्यथा तो परदेशात पळून गेला असता, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
नेमकी सूत्रं कशी फिरली? खरातच्या अटकेची स्टोरी
ऑफिस बॉय नीरज जाधवने अशोक खरातच्या काळ्या कृत्यांचे सगळे व्हिडीओ शूट केले होते. याची माहिती खरातला मिळाल्यानंतर त्याने नीरजवर दबाव टाकायला सुरुवात केली होती. शिर्डी येथील एका तरुणीच्या मदतीने त्याने नीरजला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचाही प्रयत्न केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना खरातवर संशय निर्माण झाला. याचवेळी पोलीस नीरजचा शोध घेऊ लागले. त्याच्या घरीही पोलीस पथक धडकलं होतं.
यावेळी नीरजच्या आईनं पोलिसांना आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. माझ्या मुलाला घेऊन जा, नाहीतर खरात त्याचा खून करेल, अशी भीती आईनं पोलिसांकडे वर्तवली होती. यानंतर पोलिसांनी नीरजशी संपर्क साधून त्याला सुरक्षित ठिकाणी नेलं. त्याच्याकडील व्हिडीओ आणि इतर पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी अशोक खरातविरोधात सापळा रचला.
7 मार्च ते 14 मार्च या कालावधीत शिर्डी पोलिसांच्या चार कर्मचार्यांनी दोन शिफ्टमध्ये खरातच्या बंगल्याबाहेर साध्या वेशात तैनात राहून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. कोण भेटते, कोणती वाहने ये-जा करतात, तो कधी बाहेर पडतो, कुठे जातो याची सविस्तर माहिती गोळा करण्यात आली. विशेष वाहनाव्दारे त्याचा पाठलागही करण्यात येत होता. खरात परदेशात पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच 9 मार्च रोजी त्याला शिर्डीतील गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आणि 10 मार्च रोजी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. यामुळे त्याचा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन फसला.
या संपूर्ण कारवाईदरम्यान नाशिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता शिर्डी पोलिसांनी स्वतंत्रपणे ऑपरेशन राबवले, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर खरात देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता अधिक होती. दरम्यान, या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू असून शिर्डी पोलिसांनी जमा केलेले सर्व पुरावे एसआयटी कडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात अधीक्षक घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी दाखवलेली गोपनीयता, नियोजन आणि धाडस यामुळेच भोंदूबाबा अशोक खरातचा पर्दाफाश शक्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.
नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि खरातच्या कारनाम्यांची कुणकुण शिर्डी पोलिसांना लागल्यानंतर, त्याच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील त्याच्या घरी भेट दिली. तेथे त्याच्या आईकडे चौकशी केली असता, त्याच्या आईने शिर्डी पोलिसांना सांगितले की नीरजची काहीच चूक नसून त्याला तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन जा, नाहीतर अशोक खरात त्याचा खून करू शकतो. अशोक खरातचे सर्व पुरावे त्याच्याकडे असल्याचे शिर्डी पोलिसांना समजल्यानंतर, पोलिसांनी नीरजशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ताब्यात सुरक्षित ठेवले. त्याच्याकडून आवश्यक ती माहिती मिळवली जात होती. त्याच्या दोन मित्रांकडूनही पोलिसांना माहिती मिळत होती, असे सूत्रांनी सांगितले.
