राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे अचानक 'नॉट रीचेबल' झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तनपुरे उमेदवारी अर्ज भरण्याच्या मनस्थितीत नसल्याची चर्चा सुरू होती. त्यातच आता तनपुरे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या भेटीनंतर राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे माघार घेण्याची शक्यता आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी थेट संवाद
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांचा थेट संपर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी करून दिला. या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत तनपुरे यांनी मतदारसंघातील विकासाचे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. हे मुद्दे मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन रविंद्र चव्हाण आणि विखे पाटील यांनी दिल्याचे समजते.
पवारांच्या शिलेदाराची माघार?
प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मात्र, मतदारसंघाचा विकास आणि राज राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, तनपुरे यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. विखे पाटील आणि चव्हाण यांच्या मध्यस्थीमुळे आता राहुरी पोटनिवडणुकीत तनपुरे माघार घेण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राहुरीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाचे तुल्यबळ उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना माघार घेण्याची गळ भाजपने घातली. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
