मध्यरात्री 'सिल्व्हर ओक'वर खलबतं
काल रात्री उशिरा शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे प्रमुख नेते उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. नेत्यांनी पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा आग्रह धरला, मात्र पवारांनी त्यावर कोणतेही स्पष्ट उत्तर न देता मौन पाळणे पसंत केले.
advertisement
पवारांनी काय दिला सल्ला?
स्वतःच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करण्याऐवजी शरद पवारांनी आपल्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. "या जागेबाबत आधी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांशी (ठाकरे गट आणि काँग्रेस) चर्चा करा," असे निर्देश पवारांनी दिले आहेत. यामुळे ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवार कोण असणार, याचा निर्णय आता मविआच्या सामूहिक चर्चेनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पवारांच्या 'मौना'चे राजकीय अर्थ
शरद पवारांनी बाळगलेल्या मौनामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मविआमध्ये केवळ एकच जागा निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे.त्यावर ठाकरे गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी नको म्हणून पवार सावध भूमिका घेत असावेत, असे म्हटले जात आहे. आता महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
