नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर येथील भानुशाली कुटुंब रविवारी सकाळीच पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. आरे-वारे येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा पाहून कुटुंबातील तरुण उत्साहाने पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली हे दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.
स्थानिकांची देवदूतासारखी मदत
advertisement
दोघेही बुडत असल्याचे लक्षात येताच आरडाओरड झाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि आरे-वारेचे पोलीस पाटील आदेश कदम यांनी जीवाची पर्वा न करता तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने संतोष शशिकांत भानुशाली यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. सुयोग भानुशाली यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पर्यटनासाठी आलेल्या आनंदी कुटुंबावर या घटनेमुळे डोंगर कोसळला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच समुद्रात उधाण आणि अनपेक्षित लाटांचे प्रमाण वाढत असल्याने पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, या दुर्घटनेने आरे-वारे परिसरात पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
