शिक्षणाधिकाऱ्यांच्या धाडीत 'पापं' उघडी
जैतापूरच्या या केंद्रावर १४ वर्गांमध्ये ३२७ विद्यार्थी परीक्षा देत होते. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर आणि विस्तार अधिकारी सीताराम पवार यांचे पथक अचानक केंद्रावर धडकले. तपासणी दरम्यान पथकाला असे ९ कागद सापडले, ज्यावर हुबेहूब एकसारखी उत्तरे लिहिलेली होती. हा केवळ योगायोग नसल्याचा संशय आल्याने लाठकर यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आणि समोर आलेलं दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले.
advertisement
बारावीच्या पहिल्याच पेपरला परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीसमोरच खुलेआम सामूहिक कॉपी सुरू असल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलंय. याप्रकरणी १९ कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यासह निलंबनाची कारवाई होणार आहे. तर तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी त्या केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. कन्नड तालुक्यातील जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी पर्यवेक्षकांसह इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थीना इंग्रजीच्या पेपरसाठी प्रश्नांची उत्तरे पुरवली. त्यानुसार अनेक विद्यार्थी एकाच बाकड्यावर बसून सामूहिक उत्तरे लिहीत होते.
शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचे पथक केंद्रावर पोहचल्यानंतर त्यांना एकसारखी उत्तरे असणारे ९ कागद सापडले. त्यानुसार सर्वच वर्गातील सीसीटीव्हींची तापसणी केल्यानंतर हा धक्कादायक गैरप्रकार समोर आला. जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा केंद्रातील एकूण १४ वर्गात ३३४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील ३२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. वर्गामध्ये मंडळाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसविलेले आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सीसीटीव्हीच्या निगराणीत परीक्षा सुरू असतानाच शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, विस्तार अधिकारी सीताराम पवार यांचे पथक केंद्रावर पोहचले. तपासणीदरम्यान पथकाला ९ कागद सापडले. त्यावर एकसारखीच उत्तरं होती. तेव्हा अश्विनी लाठकर यांना सामूहिक कॉपीचा संशय आल्याने त्यांनी केंद्र संचालकास सीसीटीव्हीची तपासणीचे आदेश दिले. तपासणीत अनेक वर्गामध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीचे कागद देताना आढळले. त्याशिवाय विद्यार्थी एकमेकांच्या बेंचवर उठून बसत कॉपी करत असल्याचंही दिसलं.
या गैरप्रकारानंतर शिक्षण विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या असून, सखोल चौकशीनंतर दोषी विद्यार्थ्यांवरही कारवाई केली जाईल. तसेच, या सामूहिक कॉपीला खतपाणी घालणाऱ्या केंद्र संचालकांसह १९ कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वळण ठरवते, मात्र अशा प्रकारच्या सामूहिक गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरलं जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
