पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं 51 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय. सोलापूरमध्ये भाजपनं 38 जागांसह एकहाती सत्ता मिळवलीय. सिंधुदुर्गमध्ये भाजपनं 27 जागांसह वर्चस्व मिळवलं. रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेनं 41 जागांसह सत्तेचा मार्ग खुला केलाय.
कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येणार?
रायगडमध्ये भाजप-शिवसेना एकूण 38 जागांसह सत्ता मिळवू शकतात. साताऱ्यात महायुतीतील तिन्ही पक्षांच्या एकत्रित जागांचा आकडा तब्बल 62 वर पोहोचतोय. त्यामुळे साताऱ्यात महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापुरातही महायुतीतील तिन्ही पक्षांकडे 41 जागा असल्यानं त्यांची सत्ता येणार असल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित 43 जागा असल्यानं महायुतीचा झेंडा फडकणार आहे. परभणीत महायुतीचा एकत्रित आकडा 44 असल्यानं त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर झालाय. धाराशिवमध्येही महायुतीचा आकडा 40 असल्यानं तिथंही महायुती सत्तेत असणार आहे.
advertisement
सांगलीत मोठ्या राजकीय घडामोडी
बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये महायुती सत्तेचं समीकरण जुळवण्यात यशस्वी होणार असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. मात्र सांगलीत तिढा निर्माण झालाय. सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा आहेत. तिथे बहुमताचा आकडा 31 आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा एकत्रित 30 हा आकडा बहुमतापर्यंत पोहोचत नाही. तर भाजपच्या 16, शिंदेंच्या शिवसेनेच्या 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 6 जागा म्हणजेच महायुतीचा एकत्रित आकडाही 29 पर्यंत पोहोचतोय. परिणामी इथे इतर 2 विजयी उमेदवार महत्त्वाचे ठरणार आहेत. सांगलीत मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात.
लातूर जिल्हा परिषदेत सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार आहे. 59 जागा असल्यामुळे लातूरमध्ये बहुमताचा आकडा 30 इतका आहे. काँग्रेसनं सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एक जागा जिंकली आहे. त्यामुळे मविआचा आकडा 25 पर्यंत पोहोचतोय. तर भाजपनं 18, शिंदेंच्या शिवसेनेनं 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 12 जागा जिंकून एकत्रितपणे 31 जागांचा आकडा गाठलाय.
त्यामुळे लातूरमध्येही महायुती सत्तेच्या जवळ जाताना दिसतेय. एकंदरीतच अकरा जिल्हा परिषदा महायुतीच्या ताब्यात जाणार आहेत. तर सांगलीतील तिढा कसा संपुष्टात येतो, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
