मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची दीड वर्षांपूर्वी ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली, त्याने देशपातळीवर खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली असून सध्या बीडच्या विशेष न्यायालयात हा खटला सुरू आहे. या घटनेने देशमुख कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून, आजही त्यांना आरोपींच्या समर्थकांकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
advertisement
अश्विनी देशमुखांना सरपंच पदाचा दांडगा अनुभव
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या दहशतीच्या छायेत वावरत असल्या तरी गावकऱ्यांनी त्यांच्याकडेच पुन्हा नेतृत्वाची मागणी केली आहे. अश्विनी देशमुख यांना 2017 ते 2022 या काळात सरपंच पदाचा दांडगा अनुभव आहे. याशिवाय त्यांनी उपसरपंच आणि केज बाजार समितीच्या सदस्य म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. संतोष देशमुखांनी सुरू केलेली जलसंधारण आणि वृक्षारोपणाची कामे पूर्ण करण्यासाठी अश्विनीताईंनीच पुढाकार घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून धरला जात आहे.
देशमुख कुटुंब पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का?
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक जाहीर झाली असली तरी, मुख्य प्रश्न हा आहे की, वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे देशमुख कुटुंब पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. गावातील नागरिक लवकरच बैठक घेऊन अश्विनी देशमुख यांना तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या निवडणुकीच्या निकालावरून मस्साजोगमध्ये लोकशाहीचा विजय होतो की गुन्हेगारी दहशतीचा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा :
