चारही सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज न भरल्याने भाजपाच्या वतीने प्रत्येक सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकृतपणे घोषित केले.
राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे महिला बालकल्याण सभापती
सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रथमच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सभापती निवडीवर बहिष्कार टाकल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा विराज शिंदे यांची निवड झाली आहे. तर समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा ऋषीकेश धायगुडे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
advertisement
याव्यतिरिक्त, अन्य दोन विषय समिती सभापती म्हणून लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नवीन सभापतींचे भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
सुरुवात त्यांनी केली… शेवट आम्ही करणार!, मकरंद पाटील यांचा भाजपला इशारा
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या चार सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीतून झालेल्या फुटीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपला थेट इशारा दिला आहे. पाटील म्हणाले, "राजकारणात आमचे सदस्य फोडण्याची सुरुवात त्यांनी केली आहे, पण शेवट आम्ही करणार. आम्ही काल राजकारणात आलो नाही, आमच्या पन्नास वर्षांच्या पिढ्या या राजकारणात काम करत आहेत".
तसेच, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेख करत, कराडमध्ये सर्वपक्षीय निषेध नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले. संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कोर्टात गेल्याचे सांगत, कोर्टाने प्रशासनावर ओढलेले ताशेरे हा आमचा विजय असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
