नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाटणमध्ये येऊन शंभूराज देसाई यांच्याविरोधात प्रचार केला. हाच प्रचार शंभूराज देसाई यांच्या जिव्हारी लागला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात देसाई यांच्या गटाने पाटणमध्ये जोरदार कामगिरी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील राग बोलून दाखवला.
अति तिथे माती, माणसं संधीची वाट पाहत असतात
advertisement
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर, आणि शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढले होते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर पाटणमध्ये विजयी सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला टोले लगावले.
निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली, पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा. एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप... बेरीज काय झाली? अति तिथे माती होते… अति जाऊन कुठे काही केले तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात, असे म्हणत देसाईंनी भाजपवर निशाणा साधला.
पाटणचा निकाल काय लागला?
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सातपैकी सहा गट तर पंचायत समितीच्या १४ पैकी १३ गणांत शंभूराज देसाई गटाने निर्विवाद यश मिळवले. तालुक्यातील जनतेने देसाई गटाच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने त्यांनी पाटण पंचायत समितीत एकहाती सत्ता मिळवली आहे.
