नेमकं काय घडलं?
सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही मोठा नेता बैठकीत न दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह
राज्यातील महायुती सरकारचा विधीमंडळात एकत्रितपणे विरोध कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित होती. मागील काही काळातील घटनांमुळे महायुतीवर पलटवार करण्याची संधी विरोधकांच्या हाती आहे. जनतेच्या विविध मुद्यांवरही सरकारला घेरण्याची रणनीती आखली जाणार होती. मात्र, राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीमुळे मविआमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. विलीनीकरणाच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे मतभेद आहेत की आणखी काही राजकीय समीकरणे शिजत आहेत, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत वाद असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाने संख्याबळाच्या आधारे आपला दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने शरद पवारांच्या नावावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यावरूनही मविआत आलबेल नसल्याची चर्चा आहे.
आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनासाठीच्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहणार असतील, तर आगामी काळात मविआ सरकारविरोधात कशा प्रकारे लढा देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
