याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहाड येथील पुलाचे बेअरिंग बदलण्याचं काम होणार आहे. यासाठी 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत हा पुल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे, मुरबाड आणि अहिल्यानगरहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना बारवी डॅम, बदलापूर, पालेगाव, नेवाळी, लोढा, शीळ, पत्री पूल असा प्रवास करावा लागणार आहे. या प्रवासासाठी एसटी प्रवाशांना जास्त तिकिट काढावं लागणार आहे.
advertisement
एसटीही अत्यावश्यक सेवा
कल्याणहून अहिल्यानगरला जाण्यासाठी दर 15 मिनिटांनी बस सुटतात. कल्याण-मुरबाड मार्गावरील प्रवासी देखील या गाड्यांनी प्रवास करतात. पुलावरून अत्यावश्यक सेवांना जाण्यास परवानगी आहे. एसटीही अत्यावश्यक सेवा असल्याने या पुलावरून एसटीला वाहतुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारं पत्र एसटीच्या ठाणे जिल्हा नियंत्रकांनी प्रशासनाला दिलं आहे. त्याबाबत अद्याप उत्तर आलेलं नाही.
शेतीमालाच्या वाहतुकीला अडथळा
अहिल्यानगर आणि आळेफाटा येथून कल्याण कृषी बाजारात समितीत शेतीमालासह दुधाची आवक होते. मुरबाडच्या आसपासच्या ग्रामीण भागातूनही शेतमाल आणि दुधाची आवक होते. पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने तसेच पर्यायी मार्ग हा लांबचा असल्याने शेतमालाच्या वाहतुकीस फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय मुरबाडहून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कल्याण आणि आसपासच्या भागातून देखील काही कामगार मुरबाड एमआयडीसीत जातात. त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.