नेमक प्रकरण काय?
वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परळी गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचं संगमनेर येथील एका तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घटना समोर आली. अन्य एका घटनेत शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे ५० हजारांच्या मोबदल्यात एका अल्पवयीन मुलीचे पारनेर तालुक्यातील एका तरुणाशी लग्न ठरवल्याचं देखील समोर आलं.
या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच, त्यांनी हा प्रयत्न उधळून लावला. याबाबत आणखी खोलात जाऊन तपास केला असता पालघर, ठाणे जिल्ह्यातील अल्पवयीन कातकरी समाजातील मुलींची पैशांसाठी विक्री होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, परळी गावात कातकरी समाजातील एका १४ वर्षीय तरुणीचा २०२२मध्ये संगमनेर येथील अन्य जातीतील मुलासोबत जबरदस्तीने विवाह करून देण्यात आला होता. गावातील एका दलालामार्फत हा विवाह जुळवून देण्यात आला होता. या लग्नाला आई-वडिलांनी विरोध केल्यावर त्यांना बदनामीची भीती दाखवून गळचेपी करण्यात आली. एवढंच नव्हे तर पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिची नोंदणी दवाखान्यात करण्यासाठी तिचं वय वाढवून सांगण्यात आलं. यासाठी बनावट आधारकार्ड देखील वापरण्यात आलं.
मात्र, तिला मुलगी झाल्याने तिचा छळ सुरू झाला. पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण होऊ लागली. तसेच, तिला उपाशी ठेवून अमानुष छळ केला जाऊ लागला. या छळास कंटाळून पीडित मुलगी आपल्या गावी आली. यावेळी सामाजिक कार्यकत्यांच्या हस्तक्षेपाने हा प्रकार उघड झाला. वाडा पोलिस ठाण्यात या मुलीच्या तक्रारीवरून आत्तापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विवाह पारनेर येथील जय शिर्के नावाच्या तरुणासोबत ठरवला होता. प्रकाश मुकणे नावाच्या दलालाच्या मदतीने हा विवाह ठरवण्यात आला. या विवाहासाठी पीडित मुलीच्या कुटुंबाला ५० हजार रुपये देण्याचं देखील ठरवण्यात आलं. यातील १० हजारांची रक्कम आधीच देण्यात आली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांमुळे हळदीच्या दिवशीच या रॅकेटचा पर्दाफाश झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातील कातकरी समाजातील मुलींची नाशिक, नगर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये देखील विक्री होत असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय.