नंदुरबार : किरकोळ वादातून नंदुरबार शहरातील मार्केट परिसरात भररस्त्यावर चाकूने हल्ला करत तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर शहरात तीव्र पडसाद उमटत असून आदिवासी समाज देखील संतप्त झाला आहे. आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात खुनाच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागले असून आंदोलकनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील गाड्या फोडल्या आहेत.
advertisement
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भैय्या मराठे नामक युवकाने जय भिल या तरुणावर चाकुने किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला केला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर आदिवासी समाज बांधव आक्रमक झाला असून नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.
अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या
आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला होता. या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक झाली. पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
जखमींची संख्या वाढण्याची शक्यता
या घटनेत एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रण आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.
आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आंदोलकांची मागणी
नंदुरबार शहरात किरकोळ वादावरून जय भील याची हत्या झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आदिवासी समाज बांधवांकडून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.