सोलापुरातील सीना नदीकाठी असणाऱ्या नंदूर गावची संपूर्ण शेती पाण्यात आहे. त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली पिके डोळ्यादेखत वाहून जाताना आणि कुजताना पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं असून तूर, उडीद पाण्यात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी शासन दरबारी केली जातेय.
advertisement
नंदूरचे शेतकरी सोमनाथ बचुटे यांनी 5 एकरात उडीत आणि तूर या पिकांची लागवड केली होती. 5 एकरात लागवड केलेली तूर आणि उडीद संपूर्ण पाण्याखाली गेली आहे. उडीद आणि तूरची लागवड करण्यासाठी 25 हजार रुपये खर्च आला होता. तर 5 एकरासाठी सव्वा लाख रुपये खर्चले होते. गेले 15 ते 20 दिवस जर पाऊस थांबला असता किंवा पाणी थांबले असते तर उडीद पिक निघाले असते. चांगले उत्पन्नही हातात आले असते. परंतु, आता पावसामुळे उडीद जळून गेले असून त्याला बुरशी लागली आहे, असे शेतकरी बचुटे यांनी सांगितले.
उडीद पिकाची काढणी झाली असते तर चार पैसे आले असते. मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे साहित्याची खरेदी झाली असती, दिवाळीला मुलांच्या कपड्यांची खरेदी झाली असती. पण या पावसाने आमच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीवन नको नको झाल्यासारखं वाटत आहे. शेतकरी म्हणून जगण्यापेक्षा आत्महत्या केलेलं बर अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, अशी उद्विग्नता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी हीच परिस्थिती असते. शेतामध्ये राब राब राबून काबाडकष्ट करायचं आणि निसर्ग हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतो. सरकारचा एकही माणूस अद्याप आमच्यापर्यंत आलेला नाही. शेतकऱ्यांना राज्य सरकारने पंचनामे न करता ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी. हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करत आहे.