नेमकी घटना काय?
गवळेवाडी येथील २२ वर्षीय विवाहिता २२ फेब्रुवारी रोजी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. पोलीस या महिलेचा शोध घेत असतानाच, २७ फेब्रुवारीच्या पहाटे या महिलेची १३ महिन्यांची मुलगी अचानक घरातून गायब झाली. आई पळून गेलेली असतानाच आता मुलगीही बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ माजली होती.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेला २७ फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील बावी येथून ताब्यात घेतले. मात्र, तिने मुलगी आपल्याकडे नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पोलिसांचा संशय मुलीचा काका शंकरेश्वर माने याच्यावर बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी शंकरेश्वरने सांगितले की, भावजय पळून गेल्यामुळे गावात कुटुंबाची मोठी बदनामी झाली होती. याच रागातून त्याने २७ तारखेच्या पहाटे झोपलेल्या चिमुकलीला उचलून शेतात नेले. तिथे तिचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी कोयत्याने तिच्या शरीराचे सात तुकडे करून पोत्यात भरले. हे पोते त्याने शेतातील एका नाल्यात पुरून टाकले.
प्रत्यक्षदर्शीमुळे फुटले भांडे
आरोपीने अत्यंत सावधगिरीने हा गुन्हा केला होता. मुलगी बेपत्ता झाल्यावर सर्वांचा संशय पळून गेलेल्या आईवरच जाईल, असा त्याचा कयास होता. मात्र, पहाटेच्या सुमारास तो मुलीला घेऊन जात असताना गावातील एका व्यक्तीने त्याला पाहिले होते. त्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला. संबंधित मुलगी आपल्या भावाची नाही, असा संशय आरोपीला होता, याच कारणातून त्याने मुलीला संपवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
