उन्हाळा येतोय वेळेआधीच!
पूर्वी मार्च महिन्यात निसर्ग बहरलेला असायचा आणि हवामान सुखावह असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. मार्च महिना सुरू होताच कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, मार्चच्या उत्तरार्धात राजस्थान आणि मध्य भारतामध्ये तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचते, ज्याचे थेट चटके महाराष्ट्रालाही बसतात. यामुळे रब्बी पिकांच्या काढणीवर आणि गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या पाऊस किंवा अवकाळीची कोणतीही शक्यता नाही. हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून तापमानात झपाट्याने वाढ होईल. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आता आर्द्रता वाढणार आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काही काळ धुळीचे प्रमाण वाढू शकते, मात्र पाऊस पडणार नाही. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली या भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसले तरी पावसाची शक्यता धुसर आहे.
उत्तर भारताचा परिणाम महाराष्ट्रावर कसा?
येत्या २ मार्च रोजी उत्तर भारतात एक नवीन 'वेस्टर्न डिस्टरबन्स' (पश्चिमी विक्षोभ) दाखल होत आहे. यामुळे ३ आणि ४ मार्चला जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होईल. या बदलामुळे उत्तरेकडून येणारे वारे वेगवान होतील. याचा परिणाम म्हणून पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत धुळीची वादळं सुटतील. महाराष्ट्रात जरी याचा थेट पाऊस पडणार नसला, तरी वाऱ्यांच्या या बदलामुळे हवेतील धुलिकण वाढून मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील प्रदूषणावर परिणाम होऊ शकतो.
धूळ आणि वादळाची शक्यता
मार्च आणि एप्रिल महिन्यात तापमानामुळे जमिनीवर 'लो प्रेशर' (कमी दाबाचा पट्टा) तयार होतो. त्यात जर समुद्राकडून बाष्प आले, तर अचानक धुळीची वादळं आणि गारपीट होण्याची शक्यता असते. सध्या तरी पुढील ४-५ दिवस हवामान स्वच्छ राहील, पण जसे तापमान ४० अंशांच्या जवळ जाईल, तसे वादळाचा धोका वाढू शकतो. अशा वेळी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हवामान खात्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
