मार्चमध्ये का पडतोय पाऊस
काही ठिकाणी आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे. तर १८ ते २० मार्च दरम्यान गारपीट आणि मुसळधार पाऊस असं दुहेरी संकट येणार आहे. सध्या हरियाणाच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं असून तिथून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा थेट दक्षिण भारतापर्यंत खाली सरकताना पाहायला मिळतो. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अचानक मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडत असल्याचं स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी सांगितलं.
advertisement
कुठे होणार गारपीट
या सगळ्याचा पहिला परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यात दिसून येईल. १८ मार्चच्या संध्याकाळपासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होऊ शकते. १९ आणि २० मार्चला या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यासोबतच काही भागांमध्ये गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
18 जिल्ह्यांना पावसाचं संकट
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचे 3 दिवस महत्त्वाचे असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीदरम्यान 40 किमीपर्यंत सोसाट्याचा वारा वाहणार आहे. शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
तापमानात मोठी घट
गेल्या आठवड्यात गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात पारा ४१-४२ अंशांपर्यंत गेला होता. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि प्री-मॉन्सून हालचालींमुळे तापमानात घट झाली आहे. मुंबईसह किनारपट्टीच्या भागात उन्हाचा कडाका काहीसा कमी झाला असला, तरी आर्द्रतेमुळे उकाडा जाणवत राहील. मुंबईत सध्या तरी पावसाची शक्यता नसली, तरी अंतर्गत महाराष्ट्रात मात्र हवामान ढगाळ राहील.
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
राज्यातील अनेक भागात सध्या पिकांची कापणी आणि मळणी सुरू आहे. अशातच १८ तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली पिकं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने फळबागांनाही धोका निर्माण झाला आहे.
१८ मार्च रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची सुरुवात. १९-२० मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल आणि त्याच दम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होईल. कोकणात मात्र मुंबई-पुण्यात ढगाळ वातावरण, पण पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोकणात मात्र उष्णता वाढू शकते.
