कोकणात आज काही अंशी ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर पुढचे तीन दिवस रिमझिम पावसाच्या सरी बरसणार आहेत. उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज 50 किमी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, घाटमाथ्यावर पाऊस राहणार आहे. आजपासून पुढचे सलग तीन दिवस पाऊस राहील.
advertisement
या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट 31 मार्च रोजी देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार आहे. उर्वरित तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असल्याने कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल तर शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार आहे.
हवामान तज्ज्ञांनी सांगितलं कारण
हवामान तज्ज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या एकच नाही तर 5 वेगवेगळ्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. त्यापैकी एक कर्नाटक आणि दुसरं केरळच्या आसपास आहे. पश्चिम बंगालच्या खाडीतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अरुणाचल प्रदेशपासून आंध्र पर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनचा एक ट्रफ तयार झाला आहे. त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा इशारा आहे. तर दुसरीकडे उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, उत्तराखंडमध्ये पावसाचा इशारा आहे.
3 एप्रिलपर्यंत पावसाचं संकट
महाराष्ट्राला कर्नाटक आणि उत्तरेकडून येणाऱ्या दोन्ही वाऱ्यांमुळे हवामानात मोठा बदल होत आहे. एकीकडे टोकाची उष्णता वाढते तर दुसरीकडे धो धो पाऊस कोसळत आहे. 3 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं संकट राहण्याची शक्यता आहे. 2 एप्रिलपासून पावसाचा जोर कमी होईल आणि त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवायला विसरू नका नाहीतर पावसाने तुम्हाला भिजवलंच समजा अशी परिस्थिती सध्या राज्यातील अनेक भागात निर्माण झाली आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे काय?
चक्रीय अभिसरण ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हवा एका केंद्राभोवती फिरते. ही प्रणाली वातावरणात अस्थिरता निर्माण करते आणि त्यामुळे पाऊस, वादळे आणि जोरदार वारे येतात. जेव्हा अशा अनेक प्रणाली एकाच वेळी सक्रिय असतात, तेव्हा त्यांचे परिणाम अधिक व्यापक आणि धोकादायक असू शकतात.
