नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) सहारा इंडिया ग्रुप आणि त्याचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अधिकाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात आज न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ही चार्जशीट कोलकात्याच्या PMLA न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
advertisement
तपासामध्ये असे समोर आले आहे की- हाय रिटर्नच्या नावाखाली कोट्यवधी गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन सुमारे 1.74 लाख कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. आरोपींनी गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत. चार्जशीटमध्ये सुब्रतो रॉय यांची पत्नी सपना, मुलगा सुशांतो रॉय, जेपी वर्मा, अनिल अब्राहम आणि इतर आरोपींचा समावेश आहे. ईडीने फरारी असलेल्या मुलाच्या विरोधात नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) जारी करण्याची तयारी सुरू केली आहे.
सामान्य लोक जाळ्यात अडकले
सहारा इंडिया ग्रुप आणि त्याचे संस्थापक सुब्रतो रॉय दीर्घकाळ देशातील सामान्य जनतेसाठी सुरक्षित गुंतवणूक चे प्रतीक बनले होते. गावागावात पसरलेल्या एजंट्समुळे आणि त्यांच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे कोट्यवधी लोकांनी आपली कष्टाची कमाई सहाराच्या योजनांमध्ये गुंतवली. कंपनीचा दावा होता की- येथे पैसे गुंतवल्यास ठराविक वेळेत हाय रिटर्न मिळेल आणि भविष्य सुरक्षित राहील. मात्र काळाच्या ओघात हा विश्वास एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात बदलला,असे ईडीने म्हटले आहे.
उच्च परतावा आणि सुरक्षित बचतीचे आश्वासन
ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या चार्जशीटमुळे या घोटाळ्याचे पदर पुन्हा एकदा उलगडले आहेत. कोलकात्याच्या PMLA न्यायालयात दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये सुब्रतो रॉय यांची पत्नी सपना, त्यांचा मुलगा सुशांतो रॉय, जेपी वर्मा आणि अनिल अब्राहम यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. ईडीचा आरोप आहे की- हाय रिटर्न आणि सुरक्षित बचत च्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून सुमारे 1.74 लाख कोटी रुपये जमा केले गेले. परंतु त्यांना त्यांचे पैसे परत केले नाहीत.
सुब्रतो रॉय यांचा मुलगा फरारी
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुब्रतो रॉय यांचा मुलगा जो या संपूर्ण नेटवर्कचा भाग होता तो फरारी आहे. ईडीने सांगितले की- तो चौकशीत सहभागी होण्यापासून सतत टाळाटाळ करत आहे. आता तपास यंत्रणा त्याच्याविरुद्ध न्यायालयातून अटक वॉरंट (NBW) जारी करण्याच्या प्रक्रियेत आहे. सहारा प्रकरण ही केवळ जुनी गोष्ट नसून आजही सुरू असलेली कायदेशीर लढाई आहे.
गरीब लोक बनले मोठे शिकार
खरं तर सहाराने लहान शहरे आणि गावांमध्ये एजंट नेटवर्क उभे केले होते. हे एजंट लोकांना खात्री देत होते की सहाराच्या योजनांना सरकारी मान्यता आहे आणि येथे पैसे गुंतवणे सर्वात सुरक्षित आहे. ज्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांकडे बँकिंग सिस्टीमचा वापर नव्हता, ते या जाळ्यात सहज अडकले. कुणी आपल्या मुलीच्या लग्नासाठी, कुणी घर बांधण्यासाठी, तर कुणी म्हातारपणाच्या सुरक्षिततेसाठी सहारामध्ये गुंतवणूक केली. हळूहळू ही संख्या लाखो गुंतवणूकदारांवरून कोट्यवधींपर्यंत पोहोचली.