TRENDING:

रतन टाटांच्या निधनानंतरची सर्वात मोठी घडामोड, TATA ट्रस्टमध्ये सत्तासंघर्ष शिगेला; नोएल टाटा आणि मेहली मिस्त्री आमने-सामने

Last Updated:

Tata Trusts: टाटा ट्रस्ट्समध्ये पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे. ट्रस्टी मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला चेअरमन नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणु श्रीनिवासन आणि ट्रस्टी विजय सिंह यांनी विरोध दर्शवल्याने ट्रस्टच्या आतल्या सत्तासंघर्षाला नवं वळण मिळालं आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: टाटा ट्रस्ट्सचे ट्रस्टी मेहली मिस्त्री यांचा पुनर्नियुक्तीचा निर्णय सध्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणु श्रीनिवासन आणि ट्रस्टी विजय सिंह हे या निर्णयाला मंजुरी देण्यास नकार देऊ शकतात, अशी आतल्या सूत्रांची माहिती आहे.

advertisement

मेहली मिस्त्री यांचा कार्यकाळ 28 ऑक्टोबर रोजी संपत आहे. आणि त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय 27 ऑक्टोबर, म्हणजे आजच होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मेहली मिस्त्री दोन मोठ्या ट्रस्टचे ट्रस्टी आहेत

advertisement

मेहली मिस्त्री हे 2022 पासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) आणि सर रतन टाटा ट्रस्ट (SRTT) या दोन्ही महत्त्वाच्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही ट्रस्टकडे टाटा सन्स म्हणजे टाटा समूहाची होल्डिंग कंपनी यामध्ये 51% हिस्सेदारी आहे.

advertisement

शुक्रवारी टाटा ट्रस्ट्सचे CEO सिद्धार्थ शर्मा यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या वाढीचा प्रस्ताव मांडला होता. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार डेरियस खंबाटा, प्रमित झावेरी आणि जहांगीर एचसी जहांगीर या ट्रस्टींनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मात्र नोएल टाटा आणि वेणु श्रीनिवासन यांनी या संदर्भात कायदेशीर सल्ला (legal opinion) मागितला आहे.

advertisement

रतन टाटा यांच्या निधनानंतर मतभेद 

अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणामुळे टाटा ट्रस्ट्समध्ये कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. टाटा ट्रस्ट्समध्ये निर्णय नेहमीच एकमताने (consensus) घेतले जात होते. पण रतन टाटा यांच्या निधनानंतर ही परंपरा खंडित झाली आहे.

रतन टाटा यांच्या निधनानंतरच्या ट्रस्टच्या बहुमताने माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांना टाटा सन्सच्या बोर्डवरून हटवण्यात आले होते. हा निर्णय इतका मोठा होता की, देशभरात टाटा ट्रस्ट्सच्या अंतर्गत कलहाची चर्चा सुरू झाली. अगदी सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला.

निर्णय बहुमताने की एकमताने?

मतभेद असल्यास ट्रस्टींच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय बहुमताने होऊ शकतो का, की एकमताची अट आवश्यक आहे, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट नियम नाहीत. हे ट्रस्ट्ससाठी पूर्णपणे नवे आणि संवेदनशील प्रकरण आहे. रतन टाटा यांच्या काळात गेल्या काही दशकांत कधीही ट्रस्टच्या निर्णयांना वोटिंगची वेळ आली नव्हती.

कंपन्यांमध्ये गव्हर्नन्स Companies Act आणि इतर कायद्यांनुसार निश्चित होते. पण टाटा ट्रस्ट्सचे व्यवहार Maharashtra Public Trusts Act, ट्रस्ट डीड आणि ट्रस्टींनी वेळोवेळी मंजूर केलेल्या रिझोल्युशन्सच्या संयोगाने चालवले जातात.

1932 च्या ट्रस्ट डीडनुसार काय म्हटलं आहे?

सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या 1932 च्या ट्रस्ट डीडनुसार कोणतीही मीटिंग कायदेशीरदृष्ट्या वैध (legally valid) तेव्हाच मानली जाईल जेव्हा किमान तीन ट्रस्टी उपस्थित असतील. जर मतदानाची वेळ आली तर उपस्थित ट्रस्टींपैकी बहुमताने घेतलेला निर्णय सर्व ट्रस्टींना बंधनकारक असेल.

याशिवाय 17 ऑक्टोबरला म्हणजे रतन टाटा यांच्या निधनानंतर केवळ नऊ दिवसांनी ट्रस्टींची मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आले की प्रत्येक ट्रस्टीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याची पुनर्नियुक्ती कालमर्यादेशिवाय केली जाईल.

श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीवर मिस्त्रींची अट

अलीकडेच मेहली मिस्त्री यांनी वेणु श्रीनिवासन यांची सर दोराबजी टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी आणि उपाध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास अटींसह मंजुरी दिली होती. एका ईमेलमध्ये मिस्त्री यांनी लिहिलं होतं- जर कोणत्याही ट्रस्टीने श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीवरील प्रस्तावाला विरोध केला किंवा इतर ट्रस्टींसाठी तसाच एकमताचा प्रस्ताव आणला नाही, तर मी श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीला औपचारिक मंजुरी देणार नाही.

कोर्टात जाण्याची शक्यता

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार ट्रस्टच्या आत चर्चा सुरू आहे की, मिस्त्री श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीवरील मंजुरी मागे घेणार का किंवा या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार का? नोएल टाटा, श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी या संदर्भात कायदेशीर सल्ला घेतला आहे. मात्र, एका ट्रस्टीने स्पष्ट सांगितले की- अटींसह दिलेली मंजुरी कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नाही. एकदा प्रस्ताव मंजूर झाला की तो मागे घेता येत नाही. त्यामुळे ही अट कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नाही.

मेहली मिस्त्री कोण आहेत?

मेहली मिस्त्री हे एम. पलोनजी ग्रुपचे प्रमोटर आहेत. या समूहाचा व्यवसाय इंडस्ट्रियल पेंटिंग, शिपिंग, ड्रेजिंग आणि कार डीलरशिप अशा क्षेत्रांत आहे. त्यांची कंपनी स्टर्लिंग मोटर्स ही टाटा मोटर्सची डीलर आहे. मेहली मिस्त्री हे शापूरजी मिस्त्री आणि दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत बंधू आहेत. शापूरजी पलोनजी ग्रुपकडे टाटा सन्समध्ये 18.37% हिस्सेदारी आहे.

मराठी बातम्या/मनी/
रतन टाटांच्या निधनानंतरची सर्वात मोठी घडामोड, TATA ट्रस्टमध्ये सत्तासंघर्ष शिगेला; नोएल टाटा आणि मेहली मिस्त्री आमने-सामने
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल