माया राऊत यांचं शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झालं. इंग्रजी विषयाची भीती आणि दहावीला नापास होण्याची भीती यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. लहानपणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडिलांसोबत ऊसतोडणीसारखी कामं करावी लागायची. आपल्या वयाच्या मुली शाळेत जात असताना स्वतः मजुरी करावी लागते याची खंत त्यांच्या मनात होती, पण मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी आणि घरच्या परिस्थितीसाठी त्यांनी हे सगळं स्वीकारलं.
advertisement
लग्नानंतर काही वर्ष त्या गावीच राहिल्या. त्यांना एक मुलगी झाली. मात्र, केवळ मजुरीवर अवलंबून राहायचं नाही, काहीतरी स्वतःचं करायचं ही त्यांची जिद्द कायम होती. नातेवाईकांच्या सल्ल्याने त्या मुंबईत आल्या. सुरुवातीला छोट्या खोलीत राहून त्यांनी संघर्ष सुरू केला. काही काळ त्यांनी इतरांच्या घरी काम केलं, तसेच 25 ते 30 घरांमध्ये जाऊन शिवणकामही शिकल्या.
दरम्यान, त्यांच्या मुलांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी त्यांना क्लासमध्ये टाकलं. मुलांना मालिकांमध्ये छोटी कामं मिळू लागली. शूटिंगच्या सेटवर त्या जेव्हा घरून बनवलेला डबा घेऊन जायच्या, तेव्हा तिथल्या लोकांना त्यांच्या हातच्या जेवणाची चव खूप आवडायची. हा मसाला कुठला? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी तो स्वतः बनवलेला असल्याचं सांगितलं. याच ठिकाणी लोकांनी त्यांना मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.
यातून प्रेरणा घेऊन माया राऊत यांनी घरगुती मालवणी आणि घाटी मसाले बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी फक्त 2 ते 3 हजार रुपयांत कच्चा माल विकत घेतला. हळूहळू 1-2 किलोपासून सुरुवात करत त्यांनी आज 50 ते 60 किलो मसाले एकाच वेळी तयार करण्याइतका व्यवसाय वाढवला आहे. गेली साडेतीन वर्षे त्या हा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. यामधून महिन्याला 60 ते 70 हजार कमाई होते.