आयटीतील बड्या कंपनीत Layoff
बड्या आयटी कंपनीने केलेल्या या लेऑफनंतर आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच नोकऱ्या मिळत नाहीत त्यामध्ये आहे ती नोकरी गेल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. रात्रंदिवस मेहनत केल्यानंतरही एक झटक्यात कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. भारतीय आयटी क्षेत्रासाठी आजची सकाळ ब्लॅक वेन्सडे ठरली आहे. ओरॅकल या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगभरातील आपल्या एकूण वर्कफोर्सपैकी तब्बल १८ टक्के म्हणजेच ३०,००० कर्मचाऱ्यांना एका फटक्यात बाहेरचा रस्ता दाखवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महाकाय कपातीत भारताचा आकडा सर्वाधिक असून, देशातील सुमारे १२,००० आयटी प्रोफेशनल्सनी आपली नोकरी गमावली आहे.
advertisement
पहाटे 6 वाजता आला ई-मेल
या कर्मचारी कपातीची पद्धत अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी होती. अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपलं गाऱ्हाणं मांडताना सांगितलं की, पहाटे ५ ते ६ च्या सुमारास त्यांना 'ओरॅकल लीडरशिप'कडून एक ईमेल प्राप्त झाला. ज्यांनी २०-२० वर्षे कंपनीला दिली, त्यांनाही कोणतीही पूर्वसूचना न देता "तुमची जागा आता कंपनीत redundant झाली आहे," असं सांगण्यात आलं. ईमेल वाचून कर्मचारी सावरतात तोच त्यांचे लॅपटॉप एक्सेस आणि इंटरनल सिस्टिम्स बंद करण्यात आल्या होत्या.
12000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या
भारतात ओरॅकलचे सुमारे ३०,००० कर्मचारी आहेत, त्यापैकी जवळपास ४० टक्के म्हणजेच १२,००० लोकांना कामावरून काढण्यात आलं आहे. 'ब्लाइंड' आणि 'रेडिट' सारख्या प्लॅटफॉर्मवर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक टीम्समधील ५० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. एका मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या २० जणांच्या टीमपैकी ६ जणांना पहाटेच मेल आला.
AI मुळे नोकरी गेल्याची चर्चा
ओरॅकल सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय की, ऑपरेशन्स स्ट्रीमलाईन करण्यासाठी आणि बदलत्या गरजेनुसार हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, तज्ज्ञांच्या मते, एआयमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनी मानवी संसाधनांमध्ये मोठी कपात करत आहे. ॲमेझॉन आणि इतर टेक कंपन्यांनीही याच मार्गाने कर्मचारी कपात केली होती, पण ओरॅकलने ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने हे केलं, त्याने आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
