रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारीला पेटीएम पेमेंट्स बँकेला (पीपीबीएल) कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात जमा किंवा ‘टॉप-अप’ स्वीकारण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचं वॉलेट इतर बँकांशी जोडण्यासाठी 15 मार्चपर्यंतचा वेळ आरबीआयने ग्राहकांना दिला. त्या संदर्भात गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी (6 मार्च) एक मोठं विधान केलं. पेटीएम वॉलेटचा वापर करणाऱ्या 80-85 टक्के ग्राहकांना नियामक कारवाईमुळे काहीही त्रास होणार नाही, मात्र इतर ग्राहकांनी त्यांचं अॅप लवकरातलवकर इतर बँकांशी जोडलं पाहिजे, असा सल्ला दास यांनी दिला.
advertisement
त्यासाठी ग्राहकांना दिलेला 15 मार्चपर्यंतचा कालावधी पुरेसा असून त्याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता दास यांनी फेटाळून लावली. पेटीएम वॉलेट वापरणाऱ्यांपैकी 80-85 टक्के युजर्सचं वॉलेट इतर बँकांशी जोडलेलं आहे. पेटीएम पेमेंट्सच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे नोंदणी झालेली एकूण तीन कोटी वॉलेट्स आहेत. त्याचे 15 टक्के म्हणजे 45 लाख होतात. आरबीआयने त्यांच्या नियमांतर्गत पीपीबीएलवर कारवाई केली आहे. आर्थिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या विरोधात यात काहीही नाही, असंही दास यांनी स्पष्ट केलंय. या उलट आरबीआय आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नावीन्यपूर्णतेला पाठिंबाच देते आणि नवीन उत्पादनांच्या चाचणीबाबत बँकेने सँडबॉक्स प्रणाली (मर्यादित व्याप्तीमध्ये उत्पादनांची लाइव्ह चाचणी) आणली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, की “आयबीआय फिनटेकना (आर्थिक तंत्रज्ञान कंपन्या) संपूर्ण पाठिंबा देते व देत राहील. फिनटेकच्या विकासासाठी आरबीआय पूर्णपणे तयारही आहे.” एखादी व्यक्ती फेरारी कारची मालक असू शकते, त्याला चालवू शकते, तरीही रस्त्यांवरून कार चालवताना अपघातांपासून बचावाकरता तिला वाहतूक नियमांचं पालन करावंच लागणार, असं त्यांनी उदाहणदेखील दास यांनी दिलं.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) पेटीएम पेमेंट्स अॅप परवान्याबाबत कधी निर्णय घेईल यावर दास यांनी सांगितलं, की अंतर्गत तपासणीनंतरच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. ते म्हणाले, की पेटीएम पेमेंट्स अॅप सुरू ठेवण्याचा विचार एनपीसीआय करत असेल, तर आम्हाला काही अडचण नाही. कारण आमची कारवाई पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधात होती, असं आरबीआयनं त्यांना स्पष्ट केलं आहे. पेटीएम अॅप एनपीसीआयकडे असून त्यावर तेच विचार करतील, मात्र त्यांना यावर लवकरातलवकर निर्णय घ्यावा लागेल, असंही दास म्हणाले.
पेटीएम पेमेंट्स बँकेचं वॉलेट वापरणाऱ्या 15 टक्के म्हणजेच 45 लाख ग्राहकांनी लवकरातलवकर त्यांची खाती अन्य बँकेत हलवावी, असं दास यांनी म्हटलं आहे.
