नवरा-बायकोनं IT ची नोकरी सोडली! थेट गाव गाठलं, आता या शेतीतून करताय 30,00,000 ची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे ती गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची.
मुंबई : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची. मुंबईतील आयटी क्षेत्रात चांगल्या पगारावर काम करत असताना त्यांनी कॉर्पोरेट करिअर सोडून आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि आज सेंद्रिय शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल करणारा यशस्वी व्यवसाय उभारला आहे.
आयटी क्षेत्रातून शेतीकडे वळण्याचा निर्णय
गौरी आणि दिलीप परब हे दोघेही मुंबईतील मोठ्या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर अभियंते म्हणून कार्यरत होते. चांगले वेतन आणि करिअरच्या संधी असूनही त्यांना शहरातील धावपळीच्या जीवनापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिठवली या आपल्या गावात परतून शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
नोकरी सोडून गावाकडे परतल्यानंतर त्यांनी आधुनिक आणि सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला. कोणते पीक कमी खर्चात आणि अधिक उत्पन्न देऊ शकते, याचा अभ्यास करून त्यांनी ‘लेमनग्रास’ म्हणजेच गवती चहा या औषधी व सुगंधी वनस्पतीची निवड केली.
advertisement
२०२१ मध्ये सेंद्रिय लेमनग्रास शेतीची सुरुवात
२०२१ मध्ये त्यांनी प्रयोग म्हणून एक एकरावर लेमनग्रासची लागवड सुरू केली. कोकणातील हवामान आणि जमिनीचा प्रकार या पिकासाठी अत्यंत अनुकूल असल्याचे लवकरच लक्षात आले. त्यामुळे उत्पादनही चांगले मिळू लागले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी शेतीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.
आज या दाम्पत्याकडे एकूण आठ एकरांवर लेमनग्रासची सेंद्रिय शेती आहे. त्यापैकी सहा एकर जमीन त्यांनी स्वतः खरेदी केली आहे, तर उर्वरित दोन एकर जमीन भाड्याने घेतली आहे.
advertisement
वर्षातून तीन ते चार कापण्या
लेमनग्रास हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. या पिकाची वर्षातून तीन ते चार वेळा कापणी करता येते. तसेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा सर्व ऋतूंमध्ये हे पीक टिकून राहते. त्यामुळे वर्षभर उत्पादन मिळत राहते.
लेमनग्रासपासून सुगंधी तेल काढले जाते. साधारणपणे एका टन लेमनग्रासपासून सुमारे सात लिटर आवश्यक तेल मिळते. उन्हाळ्यात उत्पादन तुलनेने जास्त मिळते, तर पावसाळ्यात ते थोडे कमी होते.
advertisement
स्वतःचे तेल काढण्याचे युनिट
तेल काढण्यासाठी परब दाम्पत्याने स्वतःचे छोटे ऊर्धपातन (डिस्टिलेशन) युनिट उभारले आहे. या प्रक्रियेत वाफेच्या सहाय्याने लेमनग्रासमधील आवश्यक तेल वेगळे केले जाते. तयार झालेले तेल ते थेट औषधनिर्मिती आणि कॉस्मेटिक कंपन्यांना विकतात.
या तेलाला बाजारात चांगली मागणी असून एका लिटरला साधारणपणे १२०० रुपये दर मिळतो. काही कालावधीत हा दर १५०० रुपयांपर्यंतही पोहोचतो. गेल्या वर्षी त्यांच्या या व्यवसायातून सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
advertisement
लेमनग्रासपासून तयार होत आहेत नवे उत्पादने
परब दाम्पत्याने केवळ तेल विक्रीवर समाधान मानले नाही. त्यांनी लेमनग्रासपासून हर्बल फ्लोअर क्लीनर आणि नैसर्गिक साबण तयार करण्यासही सुरुवात केली आहे. या उत्पादनांसाठी लागणाऱ्या कामात गावातील महिलांना रोजगार देण्यात आला आहे.
लेमनग्रासचे तेल नारळाच्या तेलात मिसळून विशेष पद्धतीने साबण तयार केला जातो. त्यानंतर लाकडी साच्यातून बार तयार करून गावातील महिला ते कापणे, वाळवणे आणि पॅकिंग करणे अशी प्रक्रिया हाताळतात.
advertisement
ऑनलाइन विक्री आणि स्थानिक रोजगार
त्यांनी तयार केलेला हर्बल फ्लोअर क्लीनर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, तर लेमनग्रास साबण लवकरच ऑनलाइन विक्रीसाठी आणण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्या सर्व उत्पादनांना प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंग दिले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 7:38 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
नवरा-बायकोनं IT ची नोकरी सोडली! थेट गाव गाठलं, आता या शेतीतून करताय 30,00,000 ची कमाई










