मुंबई: कधीकाळी आपल्या कामाच्या गुणवत्तेमुळे चर्चेत असणारी टीसीएस (Tata Consultancy Services) कंपनी सध्या आपल्या कथित 'कारनाम्यां'मुळे मोठ्या टीकेला सामोरे जात आहे. हजारो कर्मचाऱ्यांच्या छटणीमुळे आधीच कंपनीवर टीका होत असताना, आता TCSच्या अमानुष वागणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
advertisement
कंपनीने मुंबईतील एका कर्मचाऱ्याला त्याच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेच्या वेळी सुट्टी न वाढवता, जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याचा गंभीर आरोप आहे. हा पीडित कर्मचारी गेल्या सात वर्षांपासून TCSमध्ये कार्यरत होता आणि त्याच्या खात्यात पुरेशा सुट्ट्या शिल्लक होत्या. याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, कंपनीने कर्मचाऱ्याचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्याची कायदेशीर 'ग्रॅच्युइटी'ची रक्कमही रोखून धरली होती.
फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) नुसार, मागील वर्षी या कर्मचाऱ्याच्या वडिलांना गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. अशा कठीण परिस्थितीत सहानुभूती दाखवण्याऐवजी कंपनीने पूर्णपणे उलट भूमिका घेतली. रुग्णालयात वडिलांची काळजी घेत असतानाच, टीसीएस व्यवस्थापनाकडून त्याला तातडीने कामावर रुजू होण्यासाठी वारंवार कॉल येऊ लागले आणि राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला.
एचआर विभागाने त्याला दोन पर्याय दिले: एकतर त्याने 10 महिन्यांचा पगार घेऊन राजीनामा द्यावा किंवा कंपनीकडून कामावरून काढले जाणे (टर्मिनेशन) स्वीकारावे. या कर्मचाऱ्याकडे सुट्ट्यांचा पूर्ण साठा असूनही, आणि तो एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत असतानाही, हा दबाव सुरूच राहिला. शेवटी वडिलांच्या आरोग्याच्या चिंतेमुळे आणि कंपनीच्या सततच्या दबावामुळे हताश झालेल्या त्या कर्मचाऱ्याने अखेर राजीनामा दिला. आता तो दुसऱ्या एका कंपनीत काम करत आहे.
राजीनामा दिल्यानंतर कंपनीने त्या कर्मचाऱ्याची सात वर्षांची ग्रॅच्युइटीची रक्कम रोखून धरली. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्या कर्मचाऱ्याने मुंबईतील कामगार कार्यालयात (लेबर ऑफिस) तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत, कामगार कार्यालयाने टीसीएस व्यवस्थापनाला बोलावले. कामगार आयुक्तांनी टीसीएसला कर्मचाऱ्यांप्रति चुकीच्या कामगार पद्धती (wrong labour practices) वापरल्याबद्दल ताकीद दिली. तसेच टीसीएसला त्या कर्मचाऱ्याची सात वर्षांच्या नोकरीची पूर्ण ग्रॅच्युइटीची रक्कम तातडीने देण्याचे आदेश दिले.
जवळपास वर्षभर चाललेल्या या कायदेशीर प्रकरणानंतर अखेरीस त्या कर्मचाऱ्याला त्याची संपूर्ण ग्रॅच्युइटीची रक्कम मिळाली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या कठीण परिस्थितीतही टीसीएसने माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवली नाही, अशी तीव्र टीका होत आहे.
