दहावीचं प्रेम आणि अभ्यासाचा बट्ट्याबोळ
आदित्य पांडे हे सुरुवातीपासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. ९ वी पर्यंत त्यांचा निकाल नेहमीच उत्कृष्ट असायचा. मात्र, १० वीत असताना त्यांचा जीव एका मुलीवर जडला आणि आयुष्याची गणितं बदलली. ज्या वयात करिअरचा पाया रचायचा असतो, त्याच वयात प्रेमात पडल्याने त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. साहजिकच, १० वीच्या निकालात त्यांच्या गुणांचा आलेख चांगलाच खाली घसरला. पुढे वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं, मात्र त्यांचं मन तिथं रमत नव्हतं.
advertisement
धोका मिळाला, पण ध्येय गवसलं!
ज्या मुलीसाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं, त्याच मुलीने अर्ध्यातच त्यांची साथ सोडली. नातं तुटलं आणि आयुष्याची महत्त्वाची वर्षे वाया गेल्याची जाणीव त्यांना झाली. पण याच वळणावर आदित्य यांनी रडत बसण्यापेक्षा लढण्याचा निर्णय घेतला. "एक दिवस असा येईल, जेव्हा संपूर्ण जग मला सॅल्युट करेल आणि मी क्लास वन अधिकारी होऊन दाखवेन," असा ठाम निर्धार त्यांनी स्वतःशीच केला. त्यांनी त्या मुलीलाही ठणकावून सांगितलं होतं की, "मी एक दिवस आयएएस बनूनच दाखवेन."
अपयशावर मात आणि यशाचे शिखर
ज्या क्षेत्राची त्यांना काहीच माहिती नव्हती, अशा यूपीएससीच्या मैदानात त्यांनी उडी घेतली. हाताशी असलेली चांगली नोकरी सोडली आणि ते दिल्लीला अभ्यासासाठी गेले. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांना अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर २०२३ च्या परीक्षेत त्यांच्या कष्टाला फळ मिळाले आणि त्यांनी देशात ४८ वा रँक पटकावून आपले स्वप्न सत्यात उतरवले.
बदला हिंसक नसावा, तो यशातून दिसावा
आज आदित्य पांडे हे झारखंडमधील रांची येथे आपले कर्तव्य बजावत आहेत. ज्यांनी त्यांना कधीकाळी कमी लेखले होते, त्या सर्वांना त्यांनी आपल्या यशाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तरुणांना संदेश देताना ते म्हणतात की, "तुमचा बदला हा कधीही हिंसक नसावा, तर तो तुमच्या यशातून जगाला दिसला पाहिजे."
आज आदित्य पांडे हे नाव केवळ बिहारपुरते मर्यादित न राहता, देशभरातील त्या तरुणांसाठी एक आदर्श बनले आहे, जे वैयक्तिक आयुष्यातील धक्क्यांमुळे स्वतःचे आयुष्य संपवायला निघतात. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यात खरा गर्व असतो, हेच त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
