जालना जिल्ह्यातील शेलगाव येथील रहिवासी असलेले वसंत अंभोरे हे शेतकरी पुत्र. शेतीमध्ये त्यांनी डाळिंब शेती आणि दुग्ध व्यवसाय असे प्रयोग करून पाहिले. परंतु या दोन्ही व्यवसायात त्यांना अपयश आलं. डाळिंब शेतीमध्ये रसायनांचा होत असलेला अतिवापर पाहिल्यानंतर त्यांना शुद्धतेचं आणि नैसर्गिक खाद्यपदार्थांचे महत्त्व कळलं. लोकांना शुद्ध आणि नैसर्गिक काय देता येईल याचा विचार करत असतानाच त्यांना लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय करण्याचा विचार आला.
advertisement
Bail Pola 2025 : सर्जा-राजाच्या जोडीचा साज बनणारे शेख कुटुंबीय, 3 पिढ्यांपासून करतात व्यवसाय
सुरुवातीला तीन ते साडेतीन लाखांची गुंतवणूक करून त्यांनी यासाठी लागणारे यंत्रसामग्री खरेदी केली. 2022 मध्ये व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. तेल घाण्यावर तयार होणारं तेल हे बाजारातील तेलाच्या दुप्पट दराने विक्री होतं. त्यामुळे अनेकांना ते महाग वाटतं. परंतु ज्यांना विषमुक्त आणि विषयुक्त यातला फरक कळतो ते हे तेल घेऊन जातात, असं वसंत अंभोरे सांगतात.
त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या तेलबियांपासून तेल काढून मिळतं. मुख्यत्वे करडई आणि सूर्यफूल तेलाला अधिक मागणी आहे. त्यापाठोपाठ शेंगदाणा, मोहरी आणि बदामाचे तेल देखील ते काढून देतात. या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्यासाठी अडीच ते तीन लाखांचा टर्न ओव्हर होतो. 20 टक्के नफा गृहीत धरला तरी देखील 50 ते 60 हजार रुपये प्रति महिना कमाई सहज होते, असं वसंत अंभोरे सांगतात.
रोजगार नसल्याने अनेक जण हताश असल्याचं आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहतो. परंतु मनात काहीतरी करण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर आपण देखील आपला छोटासा एखादा लघुउद्योग उभा करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो हेच वसंत अंभोरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.