2019 साली MPSC चा अभ्यास करण्यासाठी विलास पुण्यात आला. वर्षभर मन लावून अभ्यास केला. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. त्याच दरम्यान घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. वडील ऊसतोड मजूर म्हणून काम करत असल्याने जबाबदारी वाढली. कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनने परिस्थिती आणखी कठीण झाली. काही काळ तो गावी परतला. दुसऱ्या लॉकडाऊननंतर पुन्हा पुण्यात आला मात्र ज्या मित्राकडे तो पार्ट-टाईम काम करत होता, ते दुकान बंद झालेले होते. हाच क्षण विलासच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
advertisement
मित्राचे बंद असलेले दुकान भाड्याने घेऊन विलासने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पदार्थ बनवण्याची आवड असल्याने सुरुवातीला पिवळ्या पोह्यांपासून सुरुवात केली. मात्र बाजारात वेगळेपण हवे, हे ओळखून त्याने पांढरे पोहे बनवायला सुरुवात केली. ही कल्पना ग्राहकांना भावली आणि हळूहळू विलास पांढरे पोहे अशी ओळख तयार झाली.
पुण्यातील नारायण पेठ येथे पोहे जंक्शन या नावाने व्यवसाय सुरू केला. 2021 पासून ऐश्वर्याने व्यवसायात सक्रिय पाठिंबा दिला. सुरुवातीला भांडवल नव्हते मित्रांकडून उसनवार पैसे घेऊन दुकान उभे राहिले. अडचणी, कर्जबाजारीपणा, अनिश्चितता या सगळ्यावर मात करत आज विलास तीन दुकाने यशस्वीपणे चालवत आहे.
सध्या पोहे जंक्शनची दोन दुकाने आणि द एग जंक्शन असे एक दुकान कार्यरत आहे. 25 रुपयांत दर्जेदार पोहे देणाऱ्या या दुकानांना चांगली ग्राहकसंख्या आहे. पाच कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो. महिन्याला साधारण 6 ते 7 लाख रुपयांचे उलाढाल-उत्पन्न होत असल्याची माहिती विलास नलभे यांनी दिली. कधीकाळी कर्जात अडकलेला विलास आज ते कर्ज फेडून आत्मविश्वासाने व्यवसाय वाढवत आहे. अपयश आले तरी थांबू नका, परिस्थितीशी झुंज देत स्वतःची वाट शोधा विलास नलभे यांचा हा प्रवास तरुणांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरतो.